महाराष्ट्र 14 न्यूज : “कोरोनाच्या आयचा घो”
लेखाचे शीर्षक वाचून तुम्ही अचंबित झाला असाल.कोरोनामुळे उदभवलेल्या परिस्थितीमुळे जो संताप डोक्यात होता तो लेखाच्या शिर्षकातून व्यक्त झालाय.एखाद्या विषयी राग संताप असेल तर तोंडातून आपसूक शिव्याशाप येते.हा मानवी स्वभावच आहे.
त्यादिवशी ती माऊली औषध विकत घेण्यासाठी आली होती.थोडा वेळ तशीच थांबली, दुसरे ग्राहक झाल्यानंतर मी तिला विचारले “ताई काय हवे आहे?”
ती म्हणाली”एक मदत हवी आहे”
तिच्या हातात डॉक्टरने लिहुन दिलेल्या औषधांची चिठ्ठी होती.
मी विचारले “कोणती मदत?”
ती ताई म्हणाली तिचा नवरा आजारी आहे औषधी उधार पाहिजे. तिला डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी दिली व जेंव्हा तिच्याकडे पैसे जमतील तेंव्हा उधारी देण्यास सांगितले.
ती ताई मोठ्या सोसायटीच्या चार पाच घरी धुणेभांडे घरकाम करायची.नवरा बांधकाम मिस्त्रीच्या हाताखाली बिगारी काम करायचा.या दोघांच्या मजुरीतून घर खर्च चालायचा.त्याना एक मुलगा व एक मुलगी असा चार जणांचा त्यांचा परिवार.
कोरोनाचा संसर्ग होईल या भीतीने सोसायटी मधील त्या ताईला कामावरून बंद केले.
नवरा बिगारी काम करायचा पण त्याला सुद्धा पायावर वीट पडल्याने मोठी जखम झाली होती.त्याचे सुद्धा काम बंद होते.,
घरभाडे दररोज धान्य,भाजीपाला किराणा इत्यादी खर्चामुळे गाठीशी बांधलेले जमा पैसे संपले.घरभाडे थकले,खायचे प्यायचे वांध्ये झाले.
ताईला काम करणे भागच होते. पण कोरोनाच्या भीतीने कोणी त्याना घरकाम देत नव्हते..कोरोनाचा सर्वात जास्त फटका असंघटीत क्षेत्रातील कामगारांना जास्त बसला.गेल्या पाच महिन्यात १ कोटी ८९ लाख पगारी लोकांच्या नोकरी गेल्यात.एकूण नोकरवर्गच्या २२ टक्के लोक बेरोजगार झाले.या परिस्थितीसाठी दोष कोणाला द्यायचा?
दोष कोरोनाला द्यायचा की त्याला Act Of God( देवाची करणी) म्हणायचे?
या सगळ्या परिस्थितीचा विचार केला तर डोकं चक्रावून जाते अन संतापाने तोंडातून शब्द बाहेर पडतात “कोरोनाच्या आयचा घो”
दिलीप नारायणराव डाळीमकर
(शेतकरीपुत्र)
2 Comments