महाराष्ट्र 14 न्यूज, दि.२३ एप्रिल : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्तांनी निवडणुकीच्या काळात महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा काढली आहे. असे असताना आता राज्य शासनानेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजिवांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा दिल्याने याविषयी राजकीय वर्तुळात खमंग चर्चा सुरू झाली आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. पार्थ पवार यांच्या आई सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी पार्थ पवार बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये प्रचारसभा घेत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते मतदारसंघातील नागरिकांसोबत संवाद साधत आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पार्थ अजित पवार यांनी 2018-19 मध्ये राजकारणामध्ये पदार्पण केले होते. वडील अजित पवार आणि आजोबा शरद पवार यांच्याकडून त्यांनी राजकारणाचे धडे गिरवले. त्यांनी मुंबईच्या एचआर महाविद्यालयातून पदवी मिळवली आहे. पुढील शिक्षण घेण्यासाठी ते लंडनला गेले होते. 2019 मध्ये त्यांनी मावळमधून लोकसभेची निवडणूक लढवली होती.
पार्थ पवार बारामतीत प्रचारासाठी फिरत आहेत. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन ते संवाद साधत आहेत. राष्ट्रवादीत उभी फूट पडल्याने अजित पवार आणि त्यांच्या कुटुंबात काही प्रमाणात नाराजी आहे. शरद पवारांना मानणारा मोठा वर्ग बारामतीत आहे. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पार्थ पवारांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. चार दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला आहे.