महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०७ऑगस्ट) : टोकयो ऑलिम्पिकमध्ये (Tokyo Olympics) भारताला पहिलं गोल्ड मेडल मिळालं आहे. भालाफेक स्पर्धेच्या फायनलमध्ये नीरज चोप्रा याने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. नीरज चोप्रा याने पहिल्याच प्रयत्नात तब्बल 87.03 मीटर लांब भाला फेकत सुरुवातीलाच आघाडी घेतली, पण दुसऱ्या थ्रोमध्ये तर त्याने तब्बल 87.58 मीटर भाला फेकला. नीरजची ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली. नीरज चोप्राच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. तसंच हरियाणा सरकारने त्याच्यावर बक्षिसांची खैरात केली आहे. ‘नीरज चोप्राला हरियाणा सरकारच्या पॉलिसीनुसार 6 कोटी रुपये आणि क्लास-1 नोकरी दिली जाईल.
तसंच खेळाडूंसाठी आम्ही पंचकुलामध्ये कौशल्य केंद्र उभारत आहोत, या केंद्रावर आम्ही नीरज चोप्राची इच्छा असेल तर त्याला प्रमुख म्हणून नियुक्त करू. तसंच त्याला इतर खेळाडूंप्रमाणेच 50 टक्के सवलतीमध्ये जमीन विकत घेता येईल,’ अशी घोषणा हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी केली आहे.
नीरज चोप्राने गोल्ड मेडल पटकावल्यानंतर त्याच्या वडिलांनीही पहिली प्रतिक्रिया दिली आहे. देशाचं स्वप्न पूर्ण झालं आहे आणि माझ्या मुलाने हे स्वप्न पूर्ण केल्यामुळे मी आनंदी आहे. त्याने ज्या प्रकारे मेहनत केली ते बघता त्याला गोल्ड मेडल मिळेल, याचा विश्वास होता, असं नीरजचे वडील म्हणाले. नीरजने गोल्ड मेडल जिंकल्यानंतर त्याच्या घराबाहेर चाहत्यांनी एकच जल्लोष केला.
देशातील आघाडीची वाहन निर्माता कंपनी महिंद्रा अँड महिंद्राने नीरज चोप्राला त्यांची आगामी XUV700 SUV गाडी भेट देण्याचा निर्णय घेतला आहे. तब्बल १२१ वर्षानंतर नीरज चोप्राने ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये भारताला पहिले पदक मिळवून दिले. नेमबाज अभिनव बिंद्रा नंतर वैयक्तिक स्पर्धांमध्ये ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकणारा तो दुसरा भारतीय ठरला.
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी ट्विटरवर याबाबत घोषणा केली आहे. महिंद्रा कंपनी आपली फ्लॅगशिप XUV700 SUV गाडी येत्या आठवड्यात लॉन्च करणार आहे. महिंद्रा आपल्या आगामी XUV700 SUV गाडीचा जोरदार प्रचार करत आहे. या वर्षातील सर्वात अपेक्षित गाड्यांपैकी ती एक गाडी आहे.
ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट्स म्हणजे अॅथलेटिक्स हे कोणत्याही ऑलिम्पिक खेळांचे मुख्य आकर्षण असते, परंतु आजपर्यंत कोणत्याही भारतीयांनी या स्पर्धांमध्ये पदक जिंकले नाही. ब्रिटिश भारताकडून खेळत असलेल्या नॉर्मन प्रिचर्ड यांनी १९००च्या ऑलिम्पिकमध्ये अॅथलेटिक्समध्ये दोन पदके जिंकली होती, परंतु तो इंग्रज होता, भारतीय नव्हता. नीरजने भारताची १२१ वर्षांची प्रतीक्षा संपवली आहे.
5 Comments