महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१७ ऑक्टोबर) : राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांकडून सुरु असलेल्या धाडी आणि छापेमारीच्या सत्रावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा भाजपवर जोरदार हल्ला चढवलाय. महाराष्ट्राला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत आहे. तर दुसऱ्या बाजूला ईडी, सीबीआय अशा यंत्रणांकडून त्रास दिला जात आहे. ईडी, सीबीआय, आयकर विभागानं अन्य लोकांना त्रास दिला. आता अजित पवार आणि त्यांच्या बहिणींना त्रास दिला जात असल्याचा आरोप शरद पवार यांनी केलाय.
केंद्र सरकारच्या सर्व यंत्रणा राज्य सरकारला त्रास देण्यासाठी काम करत आहेत. राज्य सरकारमधल्या अनेकांना त्रास दिला. पण काही होत नाही हे पाहिल्यावर जरा मोठ्याला हात घालू म्हणून अजित पवार यांच्या कुटुंबियांवर धाडी टाकल्या जात आहे. पण ईडी-फिडी काहीही येऊ द्या, हे सरकार पडणार नाही. आता सत्ता त्याच्या हातात आहे म्हणून ते काही करत आहेत. हे फार दिवस चालत नाही. देशावर भाजप म्हणून जे संकट आलंय ते दूर करायचं आहे, असं आवाहनही शरद पवार यांनी पिंपरी-चिंचवडमध्ये बोलताना केलंय. ज्याच्या हातात सत्ता दिली त्यांनी शहराचं वाटोळं केलं. त्यांना खड्यासारखं बाजूला करा. ज्यांनी शहर घडवलं त्या राष्ट्रवादीच्या हातात पुन्हा सत्ता द्या, असंही पवार यावेळी म्हणाले.
पिंपरी-चिंचवड मधील टाटा कंपनी जेव्हा राज्य सोडून निघाली होती. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे टाटा यांना भेटले. चव्हाण यांनी टाटांना सर्व सोयी देण्याचं आणि सहकार्य करण्याचे आश्वासन दिलं. पण तुम्ही पिंपरीत या असं सांगितलं आणि टाटा इथं आले, असंही पवारांनी सांगितलं. मात्र, दिल्लीचे सरकार नवीन कारखाने सुरु व्हावीत यासाठी अनुकूल नाही. ते कामगार विरोधी आहेत. जे कामगार विरोधी निर्णय घेतात. त्यांना सत्तेवर बसण्याचा अधिकार नाही, अशी टीकाही पवारांनी केलीय.
पिंपरी-चिंचवड मध्ये हिंदुस्थान अँटिबायोटिक्स औषध निर्मिती करण्याऱ्या कंपनीला खूप मोठा इतिहास आहे. महात्मा गांधी हे नगर मध्ये होते. तेंव्हा कस्तुरबा गांधी आजारी पडल्या, पण त्याचे औषध भारतात नव्हते. त्यात कस्तुरबा मरण पावल्या. त्यानंतर महात्मा गांधी यांनी सर्वसामान्य जनतेसाठी हे औषध उपलब्ध झाले पाहिजे असं म्हंटलं. त्या नंतर पिंपरीमध्ये पेनिसिलिनचा हा कारखाना सुरू झाल्याचं पवारांनी सांगितलं.
महाराष्ट्रातील लोकांची सुख दु:ख समजून घ्यावं हे केंद्र सरकारला सांगण्यासाठी मी जिल्ह्या जिल्ह्यात जात आहे. राज्यात जिथं जाणं शक्य आहे, तिथे जाण्याचा प्रयत्न करणार. एक बातमी पक्की असते की पेट्रोल-डीझेल, गॅसच्या किमती किती वाढल्या. आपल्या भगिनींच्या संसाराचं बजेट कसं कोलमडून पडेल ही बातमीही असतेच. मनमोहन सिंग यांचं सरकार होतं तेव्हा आजचे सत्तेतील लोक आंदोलन करत लोकसभेचं सभागृह बंद पाडत होते. पी. चिदंबरम यांच्या आजच्या लेखात त्यांनी सांगितलं की 25 टक्के कर जरी केंद्र सरकारनं कमी केला तरी किंमत कमी होईल. पण केंद्र सरकार ते करताना दिसत नाही, असंही पवार यावेळी म्हणाले.
9 Comments