महाराष्ट्र 14 न्यूज : ज्योतिषशास्त्राच्या अनेक शाखांपैकी एक म्हणजे हस्तरेषा शास्त्र. ज्योतिषशास्त्रात एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीचा अभ्यास केला जातो. तर, हस्तरेषा शास्त्रात माणसाच्या हाताचा अभ्यास केला जातो. हातावरील रेषा, हातावरील चढ-उतार, बोटांवरील चिन्हे, हातावरील चिन्हे यांचा अभ्यास करून एखाद्या व्यक्तीचा स्वभाव, वैशिष्ट्ये, भविष्यातील घटनांचा अंदाज बांधता येऊ शकतो. एवढेच नव्हे, तर आपल्या तळहातावरील रेषा किती मजबूत आहेत, ठळक आहेत, त्यानुसार कोणते योग जुळून येतात, याचीही माहिती या शास्त्राचा अभ्यास करून दिली जाऊ शकते.
तळहातावरील रेषांचे स्थान, उगम, विलय एखाद्या व्यक्तीला धनवान होण्याचे योग आहेत का, याबाबत अंदाज बांधले जाऊ शकतात. आपणही आपल्या तळहातांवरील रेषा, चिन्हांची प्राथमिक माहिती घर बसल्या प्राप्त करू शकता. त्यासाठी ज्योतिषाकडे जाण्याची गरज नाही. मात्र, अभ्यासपूर्ण विवेचनासाठी ज्योतिषाचा सल्ला आवश्यक ठरतो. आपल्या तळहातावर अशी काही चिन्हे आपोआप तयार झालेली असतात, ज्यामुळे धनलक्ष्मी योग जुळून येतो. एवढेच नव्हे, तर त्या चिन्हांमुळे लक्ष्मी स्थिरावते, असेही सांगितले जाते. धनसंचयात वाढ होते. त्याचप्रमाणे एखाद्या व्यक्तीची रहस्येही या चिन्हांमुळे आपल्याला समजू शकतात. चला तर मग जाणून घेऊया…
एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर पर्वत किंवा वृक्षाचे चिन्ह असेल, तर धनलक्ष्मी योग जुळून येतो, असे सांगितले जाते. ज्या व्यक्तींच्या हातावर अशी चिन्हे असतात, त्यांच्या जीवनात नियमितपणे धनलाभाचे योग येत असतात. मुबलक प्रमाणात धनवृद्धी होते. महत्त्वाचे म्हणजे अशा व्यक्तींकडे लक्ष्मी स्थिरावते. खर्चापेक्षा मिळकत, उत्पन्न आणि धनसंचय अधिक होत असतो. मात्र, हे प्राप्त करण्यासाठी या व्यक्ती कठोर मेहनत आणि अथक परिश्रम घेतात. कोणत्याही प्रकारचे कष्ट उपसण्याची यांची तयारी असते. त्यामुळे या व्यक्तींचे भाग्यही यांना वेळोवेळी उत्तम सहकार्य आणि भक्कम पाठिंबा देते, असे सांगितले जाते.
एखाद्या व्यक्तीच्या तळहातावर ध्वज किंवा शंखाचे चिन्हे असेल, तर त्या व्यक्तींचा व्यापार स्तर आणि विस्तार मोठा होतो. एखाद्या राजाप्रमाणे या व्यक्ती आपले जीवन व्यतीत करतात. अशा व्यक्तींचा व्यवसाय, उद्योग, व्यापार परदेशातही उत्तम पद्धतीने स्थिरावतो. सरकारी क्षेत्रात मोठे मान, सन्मान, प्रतिष्ठा लाभते. मात्र, व्यवसाय, उद्योग, व्यापार वाढीसाठी या व्यक्ती कठोर मेहनत आणि अथक परिश्रम यांची कास कधीही सोडत नाहीत. नियोजन आणि उत्तम व्यवस्थापनामुळे व्यवसाय, उद्योग, व्यापार गतीमान राहतो. या व्यक्तींच्या पुढील पिढ्यांचेही जीवन सुखकारक होते.
हस्तरेषा शास्त्रानुसार, तळहातावर कलशाचे चिन्ह असणे अत्यंत शुभ असल्याचे मानले जाते. ज्या व्यक्तींच्या तळहातावर असे कलशाचे चिन्ह असते, त्या व्यक्ती धनवान होतात. धनसंचयात वृद्धी होते. धन, वैभव, ऐश्वर्य या व्यक्तींना लाभते. एवढेच नव्हे, तर अशा व्यक्तींना धार्मिक कार्ये आणि अध्यात्माचीही प्रचंड आवड असते. समाजात मान, सन्मान, प्रतिष्ठा मिळते. मात्र, या सर्व गोष्टींसाठी पडेल, ते काम करण्याची त्यांची तयारी असते. आपल्या हिमतीवर साम्राज्य उभे करण्यासाठी या व्यक्ती सक्षम असतात, असे सांगितले जाते.
39 Comments