माझा मराठीची बोलू कौतुके।
परि अमृतातेहि पैजासी जिंके।
ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।।’लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी।
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी।
धर्म, पंथ,जात एक जाणतो मराठी।
एवढ्या जगात माय मानतो मराठी॥
महाराष्ट्र 14 न्यूज,( दि.२७ फेब्रुवारी ) : “अनंत अमुची ध्येयासक्ती अनंत अन् आशा ..” आज २७ फेब्रुवारी. ज्येष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस. आजचा दिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. बालवयातच मराठी भाषेची गोडी लागण्यासाठी गेय कवितांचे मोठे योगदान असते ; पण सध्याच्या काळात नवकविता मुक्तछंदातील असल्यामुळे त्याचे सामुदायिक गायन करणे अवघड ठरते . त्यामुळे मराठीच्या भवितव्यासाठी समृद्ध साहित्याचा वारसा जोपासणे गरजेचे आहे , असे प्रतिपादन डॉ.दिलीप गरुड यांनी केले . चिंचवड येथील पुनरुत्थान समरसता गुरुकुलम येथे मराठी भाषा गौरवदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बी.आर.माडगूळकर , श्रीकांत चौगुले , नामदेव तळपे , गुरुकुलमच्या प्रधानाचार्या पूनम गुजर आदि मान्यवर उपस्थित होते .
यावेळी बोलताना डॉ.गरुड पुढे म्हणाले की , मराठी भाषा ही बोलीभाषांमुळे समृद्ध झाली आहे. बोलीभाषांतील वैविध्य आणि त्याचा बाज यांमुळे मराठी भाषेला गोडवा प्राप्त झालेला आहे .
यावेळी बोलतांना श्रीकांत चौगुले म्हणाले की , मराठी भाषेला शेकडो वर्षांची परंपरा आहे . मराठीत संतसाहित्याबरोबर अभिजात ग्रंथांची निर्मिती झाली आहे . भाषा ही प्रारंभी सांकेतिक नंतर मौखिक व नंतरच्या काळात ग्रांथिक रूपात व्यक्त होत असते. मराठी भाषा प्रवाही असून मराठीने अनेक सांस्कृतिक आक्रमणांना तोंड दिले आहे .
नामदेव तळपे म्हणाले संत ज्ञानेश्वर तुकोबारायांच्या प्रबोधनपर रचना आणि इतर संत साहित्याने मराठी भाषेला समृद्धी बहाल केली आहे . भाषेच्या रक्षणासाठी , साहित्याचे वाचन आणि नियमित लेखन आवश्यक असल्याचे सांगितले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . माडगूळकर हे होते, त्यांनी कुसुमाग्रज व इतर कवींच्या कवितांचे वाचन केले व मुलांनी कवितेचे वाचन व पाठांतर कसे करावे याचे मार्गदर्शन केले . यावेळी संस्थेच्या काही विद्यार्थ्यांनी पाठ्यपुस्तकांतील आवडत्या कवींच्या कविता वाचून आणि गाऊन सादर केल्या . कार्यक्रमाच्या शेवटी मराठी भाषेच्या संवर्धनासाठी डॉ.न.म.जोशी यांनी लिहिलेल्या ‘ जागर मराठीचा ‘ या प्रतिज्ञेचे अ.भा.मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वतीने सामुदायिक वाचन करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रधानाचार्या पूनम गुजर यांनी केले . सूत्रसंचालन हर्षाली मेंगडे यांनी केले तर आभार सतीश अवचार यांनी मानले . कार्यक्रमाच्या संयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी सहकार्य केले.
51 Comments