महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ०९ जानेवारी) : नवी सांगवी च्या विविध भागात वारंवार होणाऱ्या खंडित वीज पुरवठ्यामुळे नागरिक चांगलेच वैतागले आहेत. समता नगर, स्वामी विवेकानंद नगर, गणेश नगर, आदर्श नगर, चैत्रबन, समर्थ नगर, संत तुकाराम नगर परिसरातील काही भागांमध्ये वीज पुरवठा वारंवार या ना त्या कारणाने वीज पुरवठा खंडित होतो. तर काही भागांमध्ये वीजेचा लपंडाव सुरू असतो, कधी कधी तर १२ -१२ तास वीज गायब होते, आणि महावितरण ला माहीतही नसते, कोणी तक्रार करेल म्हणून अनेकजण वाट पाहत असतात, आता हा नित्याचा कार्यक्रम सुरू आहे, त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सुट्टीचा दिवस सकाळी सकाळी वीज नाही, त्यामुळे नागरिकांना रविवारचा (दि.९ जाने.) दिवस वीज पुरवठ्याविना काढावा लागला.
त्यातच मनपाचा होणारा पाणीपुरवठा हा दिवसाआड असल्याने वीज नसल्याने नागरिकांनी छतावर बसविलेल्या पाण्याच्या टाक्या भरणे अवघड होते. मनपाच्या सुरू असलेल्या कामांमुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याचे महावितरण चे अधिकारी सांगतात. कामाची वेळ आणि वीज गायब होण्याची वेळ, आता नवी सांगवीतील नागरिक या होणाऱ्या त्रासाला वैतागले आहेत.
नागरिकांची होणारी पिळवणूक आणि त्रासातून कायमची मुक्तता होण्याकरिता काहीतरी मार्ग काढावा, त्याकरिता स्थानिक पदाधिकारी लक्ष देतील काय? … असा प्रश्न नागरिक करत आहेत.