महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२९ एप्रिल) : राज्यातील मुदत संपलेल्या २२ महानगरपालिकांसह, जिल्हा परिषद, नगरपालिका पंचायत समितीच्या निवडणुका जून व जुलैमध्ये घेण्यास निवडणूक आयोग तयार असल्याचे वृत्त चुकीचे आहे.
आयोगाने तसे कोणतेही प्रतिज्ञापत्र सादर केले नाही. उलट सर्वोच्च न्यायालयात पावसाळ्यात निवडणुका घेण्यास अडचणी असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी सांगितले. त्यामुळे आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी दिवाळीत होणार हे निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसच्या परिवार संवाद यात्रेचा २३ एप्रिलला कोल्हापुरात समारोप झाला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, २५ एप्रिलला ओबीसी आरक्षणावर सुनावणी होत आहे. त्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिल्यास राज्य सरकारला निवडणूक घ्याव्या लागतील. त्यामुळे कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागावे असे आदेश दिले होते. मात्र २५ एप्रिलला ही सुनावणी झाली नसून ४ मे ला होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने न्यायालयात प्रतिज्ञापत्र (Affidavit) सादर करून पावसाळ्यात निवडणुका घेण्यात अडचणी असल्याचे सांगितले आहे.
एकाच टप्प्यात एवढ्या सगळ्या निवडणुका घेणे शक्य नाही. निवडणुका घ्यायच्या झाल्यास दोन तीन टप्प्यात घ्याव्या लागतील. असे आयोगाने स्पष्ट केले आहे. जरी ४ मे ला सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली तरी जून – जुलै किंवा पावसाळ्यापूर्वी निवडणूका होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निवडणुकांचा बार हा दिवाळीनंतर उडणार असल्याचे दिसत आहे. जर ऑक्टोबरमध्ये ही प्रक्रिया सुरू झाली तर किमान ३५ दिवसांचा निवडणूक कार्यक्रम असतो. त्यामुळे दिवाळी झाली की, नोव्हेंबर- डिसेंबरला कोणताही सण अथवा अडचणी नाहीत त्यामुळे या महिन्यातच निवडणूक होण्याची शक्यता आहे.