महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. २५ जून) : राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी मराठा आरक्षण दिलं नाही कारण त्यांना भीती होती की जर आरक्षणाने मुलं शिकली सवरली, मोठी झाली तर आपल्या मांडीला मांडी लावून बसतील. प्रस्थापित राजकीय मराठे आणि विस्थापित मराठे अशी मोठी लढाई आहे, अशी टीका माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau khot) यांनी केली. मराठा आरक्षणावरुन त्यांनी ठाकरे सरकावर तोफ डागली.
राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले पण…
राज्यातील राजकीय प्रस्थापित आणि विस्थापित असे मराठयांचे दोन प्रकार पाडले गेले आहेत. प्रस्थापित राजकीय मराठयांना विस्थापित गरीब मराठ्यांना मोठं होऊ द्यायचं नाही. कारण ते जर एसपी, कलेक्टर, डीसीपी, तहसीलदार झाले तर ते शेजारी बसून जेवतील, आपल्या मांडीला मांडी लावून बसतील. आपल्याशी बरोबरी करतील. राज्यात अनेक मराठा मुख्यमंत्री झाले, पण त्यांनी याच भीतीतून मराठा समजाला आरक्षण दिले नाही, असा घणाघात सदाभाऊ खोत यांनी केलाय. ते बुलडाण्यातील संग्रामपूर तालुक्यात कार्यकर्त्यांच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी संवाद साधला.
मराठा-ओबीसी आरक्षणावरुन खोत यांची राज्य सरकारवर टीका
सदाभाऊ खोत यांनी मराठा आरक्षणावरुन सरकारला लक्ष्य केलं. तसंच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून देखील महाविकास आघाडी सरकारवर ताशेरे ओढले. ओबीसी आरक्षण गेलं त्याचं कारणआहे जनगणना… सरकारने गावागावात जाऊन का डोकी मोजली नाही? अनेक शासकीय अधिकारी या कोरोनच्या काळामध्ये लाख- दीड लाख पगार घेऊन घरातच बसून होती, त्यांना सांगता आलं असतं की, जा गावात चार घरं फिरुन जनगणना कर आणि अहवाल दे, तर दीड वर्षा झालं नसतं का? असा खास शैलीत त्यांनी सरकारवर टीकास्त्र डागलं.
5 Comments