महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२५जून) :कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्य सरकारने इयत्ता १० वी बोर्डच्या परीक्षा रद्द केल्या. त्यानंतर १० वीच्या निकालासंदर्भातही राज्य सरकारने नवा आरखडा तयार केला. परंतु निकालानंतर ११ वी प्रवेश प्रक्रियेचं काय अशा प्रश्न अनेक विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. याचपार्श्वभूमीवर ११ वी प्रवेशाबाबात आज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी मोठी घोषणा केली आहे. १० वीच्या निकालासाठी विविध परीक्षा मंडळांकडून शाळास्तरावर होणारे अंतर्गत मूल्यमापन लक्षात घेता अकारावीच्या प्रवेशासाठीची एक वाक्यता रहावी व सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैकल्पिक (Optional) सामाईक प्रवेश परीक्षा (CET) परीक्षा जुलै महिन्याखेरीज किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात आयोजित केली जाईल अशी घोषणा आज शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी केली आहे.
याबाबत वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, ही प्रवेश परीक्षा पुर्णतः ऐच्छिक असून परीक्षेबाबत विद्यार्थ्यांना आगाऊ माहिती मिळावी तसेच परीक्षेची तयारी करण्यासाठी पुरेसा अवधी मिळावा यासाठी खालील माहिती जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळांशी संलग्न असलेल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व मंडळांच्या म्हणजेच राज्य मंडळ, CBSE, CISCE व सर्व आंतरराष्ट्रीय मंडळे यांच्या अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी परीक्षा आयोजित करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली.
११ वी प्रवेशासाठी CET परीक्षा प्रक्रिया कशी असणार?
११ वी प्रवेशासाठीची ही CET परीक्षा राज्य मंडळाच्या दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असणार आहे. १०० गुणांसाठी असणाऱ्या या परीक्षेत विद्यार्थ्यांसाठी बहुपर्यायी प्रश्न असतील तसेच OMR पद्धतीने २ तासांची परीक्षा घेण्यात येईल. ही परीक्षा ऑफलाईन घेतली जाणार आहे. यात इंग्रजी, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांवर प्रत्येकी २५ गुणांचे प्रश्न असतील.
या प्रवेश परीक्षा, आयुक्त शिक्षण यांच्या देखरेखीखाली महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत आयोजित करण्यात येईल. परीक्षेसाछी परीक्षा केंद्रांची यादी राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत घोषित करण्यात येईल. इ.११ वीच्या प्रवेशासाठीची ही परीक्षा विद्यार्थ्यांसाठी पूर्णत: ऐच्छिक असल्याने १० वीच्या निकाल लागल्यानंतर राज्य मंडळ किंवा परीक्षा परिषदेमार्फत पोर्टलवर विद्यार्थ्यांसाठी परीक्षेला प्रविष्ठ होण्यासाठी पर्याय उपलब्ध करुन देण्यात येईल.
सन २०२०-२० या शैक्षणिक वर्षासाठी इ. १० वीच्या परीक्षेला प्रविष्ठ झालेल्या राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना इ. १० च्या परीक्षेसाठी परीक्षा शुल्क भरले असल्याने अशा विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी शुल्क भरावे लागणार नाही,
मात्र CBSE, CISCE सर्व आंतरराष्ट्रीय बोर्ड आणि अन्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना सामाईक प्रवेश परीक्षेसाठी राज्य मंडळाने जाहीर केलेले शुल्क भरावे लागणार आहे. इयत्ता १० वीचा निकाल साधारणत: १५ जुलैदरम्यान जाहीर होईल, त्यामुळे ही सामाईक प्रवेश परीक्षा निकाल जाहीर झाल्यानंतर २ आठवड्यांमध्ये ( म्हणजे जुलैअखेरीस किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात) आयोजित केली जाईल.
सामाईक परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणांच्या आधारे अकरावीच्या प्रवेशासाठी महाविद्यालयांमध्ये प्राधान्य देण्यात येईल. सामाईक प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्राधान्य प्रवेश देण्यात येईल. त्यानंतर उर्वरित जागांवर ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली नाही अशा विद्यार्थ्यांसाठी खुल्या असतील. त्यांना १० वीच्या मुल्यमापन पद्धतीनुसार गुणांच्या आधारे प्रवेश देण्यात येतील.
893 Comments