महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२२मे) : पाडव्याची सभा, भोंगा प्रकरण, ठाण्याची उत्तर सभा, औरंगाबादची सभा, रद्द झालेला अयोध्या दौरा, विरोधकांची टीका या सगळ्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज काय बोलणार, त्याच्या हिटलिस्टवर कोण असणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेला सुरूवात झाली आहे. भाषणाच्या सुरूवातीलाच राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे.
▶️शरद पवारांना टोला :-
काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंची पुण्यात सभा होणार होती. मात्र ती पुढे ढकलण्यात आली होती. पावसाची शक्यता वर्तवल्याने राज ठाकरेंच्या सभेचा दिवस बदलण्यात आला होता. यावर राज ठाकरेंनी आजच्या सभेत भाष्य केलं.
निवडणूका नाहीत कशाला उगाच पावसात भिजत भाषण करायचं, असं म्हणत राज ठाकरेंनी शरद पवारांना सभेत टोला लगावला आहे.
▶️राणा दाम्पत्याला टोला :-
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण कऱण्याचा अट्टाहास केल्याने अडचणीत सापडलेल्या राणा दाम्पत्याला जेलमध्ये जावं लागलं होतं. त्यानंतरही त्यांनी हनुमान चालिसेचा मु्द्दा लावूनच धरला होता.
या दोघांवर राज ठाकरेंनी पुण्यातल्या सभेतून टीका केली आहे. तसंच त्यांच्यावर आरोप- प्रत्यारोप करणारे संजय राऊत लेहमध्ये त्यांच्यासोबतच जेवत होते, यावरूनही टीका केली आहे.
राज ठाकरे म्हणाले, ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, ते आपल्या विरोधात एकत्र येतात, बाकी वेळी भांडत असतात. म्हणजे बघा ना ते राणा मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी गेले होते. अरे मातोश्री बंगला काय मशीद आहे का?त्यांना अटक केली, मग ते आत होते, मधू इथे आणि चंद्र तिथे, मग ते एकत्र आले, त्यांना सोडलं. शिवसेनेकडून वाट्टेल ते बोलले, शिवसेना वाट्टेल ते बोलली. एवढ्या सगळ्या ड्रामानंतर हे दाम्पत्य आणि संजय राऊत एकत्र जेवताना दिसले. ज्यांच्यामुळे एवढं प्रकरण घडलं, त्यांच्यासोबत तुम्ही जेवताय, खांद्यावर हात ठेवून फिरताय. ह्यांचं हिंदुत्व ढोंगी आहे.
▶️उद्धव ठाकरे यांच्यावर टोला :-
मी जेवढी आंदोलने केली तेवढ्या सगळ्या आंदोलनांना यश आले आहेत. रेल्वे भरतीवेळी केलेली आंदोलनाही यश आले आहे. त्यावेळीपासूनच रल्वेची भरती त्या त्या राज्यातील भाषेत होत आहे. टोल नाक्यांच्या आंदोलनाही यश आले आहे. मी ज्यावेळी आंदोलने केली त्यावेळी पासूनच ६० ते ७० टोल नाके बंद केली आहेत, अंसही राज ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांच्यावर एकतरी आंदोलनाची केस आहे का हे त्यांनी अगोदर सांगावे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला.