महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२० जून) : विधान परिषद निवडणुकीचा निकाल लागण्यास सुरूवात झाली आहे. शिवसेनेचे दोन्ही उमेदवार विजयी झाले आहेत.
आमश्या पाडवी आणि सचिन आहिर या दोन्ही उमेदवारांचा विजय झाला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर विजयी झाले आहेत. तर भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत.
उमा खापरे, प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि श्रीकांत भारतीय हे चार उमेदवार विजयी झाले आहेत. आता लढत आहे ती भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यात. भाजपने पाच उमेदवार दिले होते. तर इतर तिन्ही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार दिले होते. आज सकाळपासून ज्या घडामोडी घडत होत्या त्यानंतर उमा खापरे पडतील आणि प्रसाद लाड विजयी होती अशी चर्चा होती. अशात आता भाई जगताप आणि प्रसाद लाड यांच्यातच चुरस रंगताना दिसतं होती यातही प्रसाद लाड यांनी बाजी मारली आहे.
प्रसाद लाड आणि भाई जगताप यांच्यात खरी चुरस होती मात्र प्रसाद लाड पहिल्याच फेरीत निवडून आले आहेत. काँग्रेसने ही लढाई चुरशीची केली होती. मात्र भाजपने मैदान मारलं आहे. सलग दुसऱ्यांदा भाजपने महाविकास आघाडीला धोबीपछाड दिला आहे. राज्यसभेच्या वेळीही तिसऱ्या जागेत लढत होती. तर आज पाचव्या जागेसाठी लढत होती. अशात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची किमया साधली आहे. पाचव्या जागेवर प्रसाद लाड निवडून आले आहेत.विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासूनच बीजगणित,अंकगणित घोडेबाजार अशा सगळ्या चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र अंकांची ही जुळवाजुळव व्यवस्थित जमवली गेली आणि भाजपने मैदान मारलं आहे.
विधान परिषद निवडणूक
विजयी उमेदवार, कोणाला किती मतं?
शिवसेना
सचिन अहिर – २६
आमश्या पाडवी – २६
भाजप
राम शिंदे – २६
श्रीकांत भारतीय – २६
प्रवीण दरेकर – २६
उमा खापरे – २६
राष्ट्रवादी
एकनाथ खडसे – २७
रामराजे नाईक निंबाळकर -२६
काँग्रेस
भाई जगताप – २६