महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रात विधानसभेला युती केली ही एकच गोष्ट चुकली, नाही तर विधानसभा निवडणुकीत 150 च्या पुढे गेलो असतो असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सेवा सप्ताहाच्या व्हर्च्युअल रॅलीत बोलत होते. यावेळी त्यांनी पत्रकार भाऊ तोरसेकर यांच्या राजकीय भाकितांचा आधार घेत हे वक्तव्यं केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “भाऊ तोरसेकर यांनी 2013 मध्येच सांगितले होते की भाजपने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदाच्या उमेदवारीसाठी निवडलं तर संपूर्ण बहुमत 272+ जागा भाजपला मिळतील. त्यावेळी अनेकांना हे जरा जास्त सांगत आहेत असं वाटलं, पण ते सत्य झालं. 2019 मध्ये देखील देशात अस्थिरतेचं वातावरण होतं. बिहार आणि दिल्लीसारखी एखादी निवडणूक हरलो होतो. अशावेळी अनेकांना वाटत होतं नकारात्मक वातावरण आहे. अनेक पक्ष एकत्र झाले होते.
त्यावेळी देखील भाऊ तोरसेकर यांनी भाजपला 300 पेक्षा अधिक जागा मिळतील असं सांगितलं होतं. ते देखील सत्य झालेलं आपण बघितलं. “खरं म्हणजे एकच गोष्ट आपली चुकली. भाऊ तोरसेकर यांनी विधानसभेच्या आधी एक पुस्तक लिहिलं होतं. त्यात त्यांनी भाजपला पर्याय दिले होते. भाजप 150+ किंवा युती 200+. त्यावेळी आपण युतीचा पर्याय निवडला. तो पर्याय स्वीकारला नसता तर भाऊ तोरसेकर यांचं तिसरं भाकित देखील खरं ठरलं असतं,” असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
21 Comments