महाराष्ट्र 4 न्यूज, (दि.२८ जुलै) : जुनी सांगवी येथील श्री हाईट्स इमारतीच्या तळमजल्यावर असणाऱ्या टपाल कार्यालयाची दिवसेंदिवस दयनीय अवस्था होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. येथील टपाल कार्यालयात गेली काही दिवस स्लॅब मधून दिवसभर गळती होत असल्याने सर्वत्र पाणीच पाणी होत आहे. हे पाणी शौचालयाचे असल्याने अक्षरशः दुर्गंधी पसरत आहे. त्यातच चिचुंद्री, उंदरांचा वावर होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
त्यामुळे टपाल कार्यालयातील महिला अधिकारी खुर्चीवर चक्क मांडी घालून कामकाज करीत असल्याचे पहावयास आहे. गेली काही दिवस स्लॅब मधून गळती होत असल्याने दररोज सकाळी टपाल कार्यालय उघडल्यावर अक्षरशः दुर्गंधीचा सामना अधिकाऱ्यांना करावा लागत आहे. स्वच्छता कर्मचारी दुपारी बारा नंतर येत असतो त्यामुळे सकाळी कार्यालयात गळती होऊन फरशीवर साचलेले पाणी स्वतः अधिकारीच पुसून काढत असल्याचे सांगितले.
येथील कार्यालयात २० जुलै रोजी नवीनच महिला अधिकारी यांनी येथील टपाल कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. त्या दिवसापासून गेली आठ दिवस ही परिस्थिती आहे. या टपाल कार्यालयाच्या शेटरला ग्रीस न लावल्याने सकाळी महिला अधिकाऱ्यांना उघडता उघडत नाही. अनेकदा मदत घ्यावी लागते. टपाल कार्यालयात स्वच्छतागृह, शौचालय नसल्यामुळे इमारतीला रस्त्यावरून वळसा घालून मागच्या बाजूला अधिकारी व कर्मचाऱ्यांना जावे लागत आहे. हात धुण्यासाठी पाण्याची सोय नाही.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे टपाल कार्यालयासमोर मोठ्या प्रमाणात पाणी साचून ते कार्यालयात शिरते. यासाठी प्लास्टिकचा कागद लावण्यात आला आहे. त्यामुळे रस्त्यावरून नागरिकांना टपाल कार्यालय दिसून येत नाही. चिचुंद्री, उंदरांचा वावर फरशिवरून सतत होत असल्याने व जमिनीवरील फरशीवर पाणी येत असल्याने चक्क अधिकारी मांडी घालून तासंतास टपाल कार्यालयात कामकाज करीत आहेत. दुपारचे जेवणही येथील व कर्मचारी आजूबाजूच्या परिसरात जाऊन करीत आहे. इतकी बिकट परिस्थिती येथील कार्यालयात असल्याचे दिसून येत आहे. उंदीर-चिचुद्रीच्या वावराने तिथे असणारे कागदपत्रे टपाल यांना धोका संभवतो.
या ठिकाणी नागरिक आणि एजंट पोस्टाच्या योजनेचे पैसे जमा करतात, त्याच्या सुरक्षेसाठी या ठिकाणी काहीच व्यवस्था दिसून येत नाही. एका महिलेने हे सर्व कसे सांभाळायचे हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संबंधित वरिष्ठ प्रशासन अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष न करता येथील टपाल कार्यालयातील महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांची होणारी कुचंबणा त्वरित थांबवावी अशी मागणी टपाल कार्यालयात येणाऱ्या एजंट, ग्राहक, नागरिक यांच्याकडून होत आहे.
गेल्या आठ दिवस आधी मी येथील टपाल कार्यालयाचा पदभार स्वीकारला आहे. सकाळी नऊ वाजता टपाल कार्यालयात येत असते. महिला असल्यामुळे शटर लवकर उघडता येत नाही. दररोज टपाल कार्यालयात पाय ठेवताच दुर्गंधी मोठ्या प्रमाणात पसरते, स्वच्छता कर्मचारी दुपारी येत असल्याने गेली चार दिवस मीच वायफरच्या साहाय्याने फरशी पुसून कामकाज सुरू करते. चिचुंद्री, उंदरांचा वावर असल्यामुळे खुर्चीवर पाय वर करून मांडी घालून काम करावे लागत आहे. अनेकदा वरिष्ठांना तक्रार करूनही दखल घेत नाहीत. असे तेथे काम करणाऱ्या महिला टपाल अधिकारी मोनिका जैन यांनी सांगितले.
टपाल कार्यालयात गळती होत असल्याची माहिती मिळाली. इमारतीच्या मालकाला तसे कळविले आहे. येत्या दोन दिवसात दुरुस्ती करून देत आहेत. त्यानंतर मी स्वतः पाहणी करतो. तेथील परिस्थिती पाहून सर्व व्यवस्था करून देण्यात येतील.
नितीन बने, पिंपरी पोस्ट ऑफिस जनसंपर्क डाक निरीक्षक
———————————————-आम्ही दररोज आरडीचे पैसे जमा करण्यासाठी येथील टपाल कार्यालयात सकाळी बारा ते पंधरा जणी येत असतो. गळती थांबविली जाईल, दुरुस्ती होईल, कुबट वास, दुर्गंधी याचे काय? चिचुंद्री, उंदरांचा वावर कसा बंद करणार? मुळात टपाल कार्यालय सुसज्ज अशा जागेत असावे. जिथे शौचालय, पाण्याची सोय, बेसिन, बसण्याची सोय असावी.
महिला एजंट, जुनी सांगवी