महाराष्ट्र 14 न्यूज, (दि१२जून) : खासदार संभाजी छत्रपती आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यातील वाद काही थांबताना दिसत नाही. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून संभाजीराजेंनी चंद्रकांत पाटलांवर टीका केली आहे. मला कुणी शिकवण्याची गरज नाही. देवेंद्र फडणवीसांनी जर मला सल्ला दिला तर बोलेल. आता बोलणार नाही, अशा शब्दांत संभाजीराजेंनी चंद्रकांतदादांना सुनावलं.
खासदार संभाजी छत्रपती आज कोपर्डीत आले होते. यावेळी त्यांनी पीडिताच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. त्यावेळी त्यांना 16 जूनच्या मोर्चाविषयी विचारण्यात आलं. तसेच चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या टीकेवरही विचारण्यात आलं. त्यावर मी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आहे. त्यामुळे मी लोकांना वेठीस धरू शकत नाही. 2007 पासून मी मराठा आंदोलनात आहे. हे केव्हा आले हेच मला कळत नाही. जरा त्यांना विचारा, असं सांगतानाच मला कुणी शिकवण्याची गरज नाही. मला देवेंद्र फडणवीस सल्ला देत असतीर तर मी त्यावर बोलेन, असं संभाजीराजे म्हणाले.
आम्ही संभाजीराजेंना भाजपचे मानतो, ते स्वत:ला भाजपचे मानतात की नाही माहीत नाही, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली होती. त्याचाही त्यांनी समाचार घेतला. गेल्या दोन तीन दिवसांपासून त्यांना संभाजीराजेच दिसत आहेत. आपण रोज सकाळी उठल्यावर देवाचा मंत्र म्हणतो. ते संभाजीराजेंचा मंत्र म्हणत आहेत. आमच्यात का दुरावा आहे हे त्यांनाच विचारा. मी काही ज्योतिषी नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी ज्योतिषाला कधीही मानलं नाही, असं सांगतनाच मी राष्ट्रपती नियुक्त खासदार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणावर मी सर्व काही बोललो आहे. समाजाने 58 मोर्चातून आपल्या भावनाही मांडल्या आहेत. आता काही बोलण्यासारखं राहिलं नाही. त्यामुळे समाजाला रस्त्यावर आणावं या मताचा मी नाही. समाज बोललाय, मीही बोललोय. आता लोकप्रतिनिधींनी बोललं पाहिजे. राज्याची जबाबदारी काय आणि केंद्राची जबाबदारी काय हे लोकप्रतिनिधींनी सांगायला हवं, असं सांगतानाच आरक्षणावर दोन तीन मार्ग मी सांगितले आहेत. कोणत्या मार्गाने जायचं हे सरकारनेच ठरवायचं आहे, असं ते म्हणाले. मराठा आरक्षणासाठी अजून दीड वर्ष जाईल. तोपर्यंत मराठा समाजाच्या विकासासाठी पाच मागण्या करण्यात आल्या आहेत. त्याची अंमलबजावणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
17 Comments