महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ११ एप्रिल २०२२) : पुरेशा दाबाने सुरळीत पाणीपुरवठा करणे, रस्ता डांबरीकरण करणे, रस्त्यांवरील खड्डे बुजविणे, बंद असलेले जलतरण तलाव सुरु करणे, पदपथावरील अतिक्रमण हटविणे, पाणी बीलांच्या बाबतीत तक्रारी सोडविणे, पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईनची दुरुस्ती करणे, रहदारीच्या रस्त्यांवर गतिरोधक आणि दुभाजक बसविणे, अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणे, कचरा संकलनासाठी छोटी वाहने उपलब्ध करून देणे, आरोग्य आणि स्वच्छता विषयक समस्येचे निराकरण करणे, विद्युत पुरवठा नियमित व सुरळीत करणे आदी समस्या आज झालेल्या जनसंवाद सभेत मांडण्यात आल्या.
महापालिकेच्या सर्व आठही क्षेत्रीय कार्यालयांमध्ये जनसंवाद सभा पार पडली. यामध्ये अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयामध्ये अनुक्रमे २०,२२,१४,१४,१९,१२,२५,१० अशा एकूण १३६ सूचना / तक्रारी प्राप्त झाल्या.
‘ह’ प्रभाग क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या सभेत नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, हनुमान जयंती तसेच फिरंगाई देवीच्या उत्सवा निमित्ताने सोईसुविधा कराव्यात अशी मागणी केली. यामध्ये पाणीपुरवठा, विद्युत, कुस्ती आखाडा करीता माती, अग्निशमन, आरोग्यासाठी व्यवस्था करण्यात यावी याची मागणी केली. यावर कार्यवाही करण्याचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी आणि क्षेत्रीय अधिकारी विजयकुमार थोरात संबंधितांना तसे आदेश दिले.
अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह, या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अनुक्रमे बीआरटीएसचे सह शहर अभियंता श्रीकांत सवणे, बांधकाम परवानगी विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम, भूमी आणि जिंदगी विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत जोशी, नागरवस्ती विभागाचे उप आयुक्त अजय चारठणकर, सह शहर अभियंता सतीश इंगळे, अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, उप आयुक्त चंद्रकांत इंदलकर, पर्यावरण विभागाचे सह शहर अभियंता संजय कुलकर्णी यांनी भूषवले.
आठही क्षेत्रीय कार्यालयातील जनसंवाद सभेत क्षेत्रीय अधिकारी अनुक्रमे शितल वाकडे, अभिजित हराळे, अण्णा बोदडे, उमाकांत गायकवाड,राजेश आगळे, सीताराम बहुरे, रविकिरण घोडके, विजयकुमार थोरात, यांच्यासह स्थापत्य, जलनिस्सारण, पाणीपुरवठा, विद्युत, नगररचना विभागांचे कार्यकारी अभियंता उद्यान, वैद्यकीय, आरोग्य, करसंकलन विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होते.
दर आठवड्याच्या सोमवारी होणा-या जनसंवाद सभेस नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.