महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१५ जून) : जालन्यात भाजपच्या वतीने बुधवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वाखाली जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
देवेंद्र फडणवीस सरकारने जालना शहराच्या विकासासाठी भरपूर निधी दिला होता. पण आघाडी सरकारने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या शहराचा विकास खुंटला, असा आरोप केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी बुधवारी केला. भाजपच्या वतीने काढण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्चाच्या प्रारंभी ते बोलत होते.
शहरातील मामा चौकापासून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाला प्रारंभ झाला. या मोर्चात जालनेकर मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. जालना हे औद्योगिकदृष्ट्या देशातील महत्त्वाचे शहर आहे. पण इथल्या पाणी आणि अन्य प्रश्नांची सरकार सोडवणूक करू शकले नाही, असा आरोप दानवे यांनी केला.
या मोर्चात नागरिकांच्या हातात पाणी प्रश्नासंबंधी विविध फलक होते. देवेंद्र फिरसे हा नारा ऐकावयास मिळाला. या मोर्चात महिला डोक्यावर मडकी घेत सहभागी झाल्या होत्या.