महाराष्ट्र 14 न्यूज : देशाला स्वातंत्र्य मिळूनही मराठवाड्याच्या नशिबी निजामाची व रझाकारची पुढील वर्षभर गुलामगिरीच होती. या जुलमी राजवटीविरोधात मराठवाड्यातील क्रांतिकारकांनी जो लढा दिला तो लढा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याइतकाच संघर्षमय होता. त्यामुळे भविष्यात मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा पुढील पिढ्यांसाठीही प्रेरणादायी असेल, असे प्रतिपादन भाजप नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी केले.
मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रहाटणी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी टाटा मोटर्स कर्मचारी सहकारी पतपेढीचे संचालक सुभाष दराडे, टाटा मोटर्स एम्प्लॉईज युनियनचे सह संचालक नामदेव शिंत्रे, धोंडीराम कुंभार, मराठवाडा मित्र मंडळाचे सदस्य त्रिमुख येलोरे, अमरदीप मस्के, संतोष जाधव, चौफेर महाराष्ट्र न्यूजचे संपादक मंगेश सोनटक्के आदी मान्यवर उपस्थित होते. नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी शहीद स्तंभ आणि स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
यावेळी बोलताना त्रिभुवन म्हणाले की, 17 सप्टेंबर हा खऱ्या अर्थाने आमचा मराठवाड्यातील सर्व जनतेचा स्वातंत्र्यदिनच आहे. या दिवसाला 15 ऑगस्ट एवढेच महत्व आमच्यासाठी आहे. कारण भारताच्या स्वातंत्र्यानंतरही निजाम आणि रझाकाराचे अन्याय, अत्याचार मराठवाड्यातील नागरिकांना सहन करावा लागला. या अत्याचाराविरोधात जो संघर्ष उभारला गेला त्या संघर्षात अनेक क्रांतिकारक शहीद झाले.
या शहिदांचा इतिहास हा मराठवाड्यातील प्रत्येक युवकांसाठी व येणाऱ्या पिढीसाठीही वर्षानुवर्षे प्रेरणादायी ठरणार आहे. मराठवाड्यातील माणूस देशाच्याच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असला तरी त्याची नाळ कायम मराठवाड्यातील आपल्या गावच्या मातीशी जुळलेली असते. त्यामुळे जगात कोठेही असले तरी असेल त्या ठिकाणी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा केला जात असल्याची भावना नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन यांनी यावेळी व्यक्त केली.
1 Comment