महाराष्ट्र 14 न्यूज : बेळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्यात आला असून त्यावर अखेर भाजपचे खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी मौन सोडलं आहे. कर्नाटक सरकारने चूक सुधारावी आणि शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी, असं सांगतानाच तुम्ही पुतळा हटवला, पण जनतेच्या मनातून हटवू शकणार नाही, अशी प्रतिक्रिया संभाजी राजे यांनी व्यक्त केली आहे. बेळगावच्या मणगुत्ती गावात पुतळा बसविण्याचा निर्णय झाल्यानंतर संभाजी राजे यांनी ट्विट करून या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केल्यानेही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
संभाजी राजे यांनी ट्विट करून ही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. कर्नाटक सरकारने वेळीच जागे व्हावे. शिवछत्रपतींच्या पुतळ्याची पुनर्स्थापना करावी. कर्नाटक सरकारने चूक सुधारावी. या देशाची संस्कृती टिकली ती महाराजांमुळे. कधीकाळी संपूर्ण कर्नाटक महाराजांच्या घोड्यांच्या टापाखाली आला होता. आज कर्नाटक जरी वेगळं राज्य असलं तरी आपली संस्कृती एकच आहे, असं संभाजी राजे यांनी म्हटलं आहे.
तुम्ही पुतळा हटवला! परंतु जनमाणसांच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेल्या शिवरायांना लोकांच्या मनातून हटवू शकणार नाही. महाराजांचा सन्मान हा संपूर्ण भारताची जनता करते. बेळगावच्या शिवभक्तांच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्र उभा आहे, असं सांगतानाच आपण सर्व जण भारतीय आहोत. आपण सर्वांनी भारतीयत्वाची भावना जोपासली पाहिजे, ती वाढवली पाहिजे. शिवछत्रपती हे राष्ट्रभावनेचे मूलाधार आहेत. कर्नाटकातले देश बांधव सुद्धा महाराजांवर प्रेम करतात हा आमचा अनुभव आहे, अशी प्रतिक्रियाही संभाजी राजे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, संभाजी राजे यांनी अत्यंत सावध प्रतिक्रिया व्यक्त केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. नेटकऱ्यांनीही त्यावरून संभाजी राजे यांना सवाल केले आहेत. अनेकांनी तर भाजपचा उल्लेख करून टीका करण्याचा सल्लाही संभाजी राजेंना दिला आहे. तर भाजपचे दुसरे खासदार उदयनराजे भोसले यांची या प्रकरणावर अद्यापही प्रतिक्रिया न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
दरम्यान, कर्नाटकातील पुतळा हटवण्याच्या प्रकरणाचे पडसाद कर्नाटकसह महाराष्ट्रातही उमटल्याने अखेर मणगुत्ती गावात आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून पुन्हा सन्मानपूर्वक बसविण्याचा निर्णय घेण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी, तहसीलदार आणि गावातील पंच यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मणगुत्ती गावात पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आला आहे. तहसीलदार आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी,पंच मंडळी यांची बैठक पार पडली असून आठ दिवसांत एकमेकांच्या सहमतीने तोडगा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
12 Comments