महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.१६ डिसेंबर) : करोनामुळे पावणेदोन वर्षे बंद असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा गुरुवार (दि.१६) पासून सुरू झाल्या. यामुळे शाळांमध्ये आता पुन्हा विद्यार्थ्यांचा किलबिलाट पाहण्यास मिळाला आहे. सर्वत्र शाळांकडूनही विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
२०२१- २०२२ हे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू झाले. मात्र, करोनामुळे प्रत्यक्ष शाळा बंदच ठेवून ऑनलाइन शिक्षण सुरू होते. ऑनलाइन शिक्षणाला विद्यार्थी कंटाळले होते. शाळा कधी सुरू होणार याचे वेध विद्यार्थ्यांना लागले होते. राज्य शासनाने शहरी भागातील इयत्ता पहिली ते सातवी व ग्रामीण भागातील इयत्ता पहिली ते चौथीच्या शाळा १ डिसेंबरपासून सुरू करण्याची घोषणा केली होती. दरम्यान, करोनाचा ओमायक्रॉन हा नवा व्हेरियंटचा प्रादुर्भाव निर्माण झाल्याने बहुसंख्य जिल्ह्यातील प्रामुख्याने शहरी भागातील शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंदच ठेवण्यात आल्या होत्या.
मुलांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये रांगोळी रेखाटली होती, तर अनेक ठिकाणी मुलांना पुष्प देऊन व टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले. चिमुकली मुले सकाळच्या गोड थंडीत मास्क लावूनच उपस्थित होती. ढोल-ताशांच्या गजरात गुलाब पुष्प देऊन मुलांचे स्वागत करण्यात आले. मुलांच्या स्वागतासाठी फुलांचे तोरण बांधण्यात आले होते तसेच संपुर्ण शालेय परीसरात विविध फूगे,मिकी माऊसची सुंदर चित्रे लावण्यात आली होती .फुलांचा वर्षाव करण्यात आला. सामाजिक अंतर ठेवून शिक्षण सुरू झाल्याचे पाहायला मिळाले.
तर वर्गात आपल्याच मित्रमैत्रिणींबरोबर अभ्यास करण्याचा आनंद मुलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता. अनेक शाळांमध्ये शिक्षणोत्सवही राबवण्यात आला. पालक स्वत:हून मुलांना शाळेत सोडायला आले होते. सुरक्षा कारणास्तव त्यांच्या चेहऱ्यावर भीती होती, मात्र मुले शाळेत जाऊ लागल्याचा आनंदही होता, असे चित्र सांगवीतील मृत्युंजय एज्युकेशन सोसायटीच्या ‘नृसिंह हायस्कूल’ च्या प्राथमिक शाळेत पहावयास मिळाले, यावेळी मुख्याध्यापिका सौ. प्रमिला जाधव आणि सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तो क्षण काही वेगळाच दिसत होता.
शाळेत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही सूचना देणारे फलक लावण्यात आले होते. शाळा प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेतली जात होती. शाळा प्रशासनाकडूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती खबरदारी घेतली जात होती.
यावेळी शाळेच्या मुख्यध्यापिका, ‘प्रमिला जाधव’ म्हणाल्या, यापूर्वी मुलांनी कधीच एवढ्या दीर्घ सुट्या अनुभवलेल्या न्हवत्या, अनेक मुलं तर पहिल्यांदाच शाळेत पाय ठेवतायेत. अनेक दिवस शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांची मानसिक स्थिती बदलली आहे. शिक्षक आणि विद्यार्थी हे नातं काही वेगळंच असतं, तेव्हा विद्यार्थ्यांना पूर्ववत शैक्षणिक प्रवाहात आणण्याकरिता त्यांना आवडेल, रुचेल, पचेल असे हलकेफुलके आनंददायी उपक्रम आम्ही आमच्या शाळेत राबविणार आहोत, जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेची आणि शिक्षणाची आवड तयार होईल. आम्हीही दीड वर्षा नंतर मुलांचा दररोज कानावर पडणारा किलबिलाट प्रत्यक्ष पाहिल्याने आनंदित झालो आहोत.
प्रा.ॲड.नितीन कदम (सचिव नृसिंह गृहरचना संस्था ) यांनी पुष्पगुच्छ देऊन बालगोपालांचे स्वागत केले. या प्रसंगी संस्थेचे प्रमुख विश्वस्त मा.शामराव कदम,विश्वस्त मा.एकनाथ ढोरे विश्वस्त विश्वस्त मा.भास्करराव पाटील यांनी लहान मुलांचे स्वागत करून शुभआशिर्वाद दिले.