महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२७ मे) : देशातील सर्वात मोठ्या बैलगाडा शर्यतीसाठी अवघ्या तीन तासांत २ हजाराहून अधिक बैलगाडा मालकांनी टोकन नोंदणी केली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात टोकन बूक होणारी ही इतिहासातील पहिली बैलगाडा शर्यत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये हा ‘रेकॉर्ड ब्रेक’उत्सव होणार असून, शेतकरी, बैलगाडा मालकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती जय हनुमान बैलगाडा मंडळाचे अध्यक्ष हनुमंत जाधव यांनी दिली.
टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर भाजपा शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे, माजी महापौर नितीन काळजे, माजी महापौर राहुल जाधव यांच्या पुढाकाराने देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत आयोजित केली आहे.
दि. २८ ते ३१ मे २०२२ सकाळी ७ ते सायंकाळी ७ या वेळेत अत्यंत नियोजनबद्ध ही शर्यत होणार आहे.
बैलगाडा शर्यतीत सहभागी होण्यासाठी टोकन बंधनकार केले होते. रामायण मैदानावरील सभागृहात गुरूवारी सकाळी ९ ते १२ या वेळेत टोकन स्विकारण्यात आले. यावेळी बैलगाडा मालकांनी मोठी गर्दी केली. या टोकनचा ‘लकी ड्रॉ’ काढून शर्यतीचे नियोजन करण्यात येणार आहे. एका बॉक्समध्ये २ हजार नावांच्या चिठ्ठया टाकल्या जातात. त्याद्वारे पहिली चिठ्ठी मिळालेला बैलगाडा पहिल्यांदा धावणार, असे नियोजन केले जाते. टोकनची रक्कम घाटात गाडा जुंपल्यावर परत दिली जाते, असे राहुल सस्ते यांनी सांगितले.
घाट एकूण १२ सेकंदाचा आहे. त्याआधारे डिजिटल घड्याळाच्या आधारे किती सेकंदात बैलगाडा शर्यत पूर्ण करतो याची नोंद केली जाते.सुमारे २ हजार बैलगाडा या घाटात धावणार आहेत. त्यापैकी पहिल्या १२० गाडा मालकांना दुचाकी बक्षीस मिळणार आहे. सेमी फायनल आणि फायनलमध्ये धावणाऱ्या बैलगाडा मालकांना जेसीबी, बुलेरो, ट्रॅक्टर आणि रोख पारितोषिक अशा बक्षीसांसाठी शर्यत होईल.