महाराष्ट्र 14 न्यूज : पिंपरी-चिंचवड शहर व परिसरात गेल्या काही दिवसांपासून दमदार पाऊस पडत आहे. त्याचप्रमाणे मावळातही पावसाने चांगली हजेरी लावली आहे. परिणामी पवना व इंद्रायणी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून, धरणाची पाणी पातळी ९८ टक्क्यांवर पोहोचली आहे. धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केला असून, नदी पात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढत असल्यामुळे महापालिकेची आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात गेल्या वर्षी पावसाने चांगलेच थैमान घातले होते. शहराने महापुराचा कटू अनुभव घेतला होता. गेल्या वर्षी तब्ब्ल १० हजारांहून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करावे लागले होते. हा अनुभव डोळ्यांसमोर ठेवून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज आणि सतर्क ठेवली आहे.
याबाबत अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील म्हणाले, मुळशी धरणातून १८ हजार क्युसेक्स आणि पवना धरणातून ३ ते ४ हजार क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग झाल्यास पवना आणि इंद्रायणी नद्यांची पाण्याची पातळी वाढते. याचा अनुभव पाठीशी असल्याने यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून येणारे पाणीही पवना आणि इंद्रायणी नद्यांमध्ये मिळते. या तीन धरणांतील पाणीसाठा वाढला आणि विसर्ग सुरू झाल्यानंतर महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेला सतर्क रहावे लागते. ही बाब लक्षात घेऊन महापालिका सर्व आव्हानांना तोंड देण्यासाठी सज्ज झाली आहे.
पवना धरणाचे सहा दरवाजे उघडले – शेटे
मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड शहराचे पाण्याचे मुख्य स्त्रोत असलेले पवना धरण ९८ टक्के भरले आहे. पवना धरण परिसरात दिवसभरात ८२ मीमी पावसाची नोंद झाली असून 1 जूनपासून १५४३ मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर रविवारी सकाळी १० वाजल्यापासून पवना धरणाचे आर्धा फुटाने सहा दरवाजे उघडून २२०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण प्रशासनाच्या वतीने पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास नदीपात्रात विसर्ग वाढविण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाचे उपभियंता अशोक शेटे यांनी सांगितले आहे.
10 Comments