महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०६ जून) : राज्यसभा निवडणुकीवरुन राज्यातील राजकारण तापले असताना आता राज्यातील 14 महापालिकांच्या निवडणुका येत्या जुलै ते ऑक्टोबरदरम्यान होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने यासंदर्भात संकेत दिले आहेत.
ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुका रखडल्या होत्या. तसेच यानिवडणुकांसाठी 31 मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरण्यात येणार आहे. सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर पार पडलेल्या सुनावणीत राज्य सरकारने केलेला कायदा फेटाळून 15 दिवसात निवडणुका जाहीर करा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाला दिले होते. त्यामुळे आता लवकरच 14 महापालिका आणि 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे.
येत्या जुलै ते ऑक्टोबर दरम्यान मुंबई, ठाणे, नागपूर महानगरपालिकेसह 14 महापालिकांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 9 महिन्यांपूर्वी निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच संभाव्य तारखांबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून संकेत मिळाले आहेत. तसेच राज्य निवडणूक आयोग या निवडणुकांसाठी 31 मेपर्यंतची मतदार यादी ग्राह्य धरणार आहेत, असे आयोगाने निश्चित केले आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 14 नागरी संस्थांच्या महापालिका आयुक्तांना पत्र लिहिले आहे. या पत्रात स्थानिक-स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तीन टप्पे असल्याचे म्हटले आहे. प्रभाग आणि आरक्षण सोडत, निवडणूक आयोगाने तयार केलेली विधानसभा मतदारसंघनिहाय मतदार यादी जाहीर करणे आणि तिसरी पायरी म्हणजे निवडणूक.
14 महापालिकांची प्रभाग रचना आणि आरक्षण सोडत पूर्ण झाली आहे. तसेच या निवडणुकीसाठीची मतदार यादी 7 जुलैपर्यंत जाहीर करण्यात येईल.
मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, नागपूर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, अकोला, अमरावती या 14 शहरांतील महापालिकांच्या निवडणुका प्रलंबित आहेत.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांतील जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. राज्यातील 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका प्रलंबित आहे. यातल्या काही जिल्ह्यात महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका प्रलंबित आहेत.