महाराष्ट्र 14 न्यूज : त्वचेची काळजी घेण्यासाठी बाजारामध्ये स्वस्त ते कित्येक महागडे ब्युटी प्रोडक्ट्स उपलब्ध आहेत. या प्रोडक्टच्या वापरामुळे तुमची त्वचा थोड्या वेळासाठी उजळेलही पण यातील केमिकलमुळे चेहऱ्याचे भरपूर नुकसान होतं. हे नुकसान टाळण्यासाठी तुम्ही स्किन केअर रुटीनमध्ये नैसर्गिक उपचारांचा समावेश केला पाहिजे. कांती तजेलदार दिसण्यासाठी गाजर, बीट आणि डाळिंबाचे सेवन करावे.गाजर, बीट आणि डाळिंबाचा ज्युस प्यायल्यास तुम्हाला चेहऱ्यावर आश्चर्यकारक बदल पाहायला मिळतील. या फळांमुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होईल. महत्त्वाचे म्हणजे या ज्युसमध्ये नैसर्गिक सामग्रींचा समावेश असल्यास त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. ज्युस तयार करण्याची प्रक्रिया जाणून घेऊया.
सर्व प्रथम गाजर आणि बीटरूटचे लहान लहान आकारामध्ये तुकडे कापून घ्या. डाळिंब देखील सोलून त्यातील दाणे प्लेटमध्ये काढून घ्या. कमी रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या लोकांसाठी बीट आणि डाळिंब खूप फायदेशीर आहे. या दोन्ही फळांचे एकत्रित सेवन केल्यास शरीराला मोठ्या प्रमाणात आरोग्यवर्धक फायदे मिळतात. गाजरामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन के असते. यातील अन्य गुणधर्म शरीरावरील जखम लवकर बरी करून त्वचेमध्ये नवीन पेशी तयार करण्यास मदत करतात. तसंच गाजरातील बीटा-कॅरोटीन त्वचेची जळजळ देखील कमी करतं.
पुढील स्टेपमध्ये डाळिंबाचे दाणे मिक्सरच्या भांड्यात वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या. डाळिंबाचा रस दुसऱ्या भांड्यामध्ये गाळून घ्या. डाळिंबाच्या रसामुळे पचन प्रक्रिया सुधारते. रक्त प्रवाह देखील वाढतो. शिवाय या फळातील औषधी गुणधर्मामुळे चेहऱ्यावर चमक देखील वाढते. डाळिंबमध्ये पॉलिफेनॉल व अँटी ऑक्सिडेंट्स असतात, यामुळे सनटॅनची समस्या कमी होते. यानंतर मिक्सरमध्ये गाजर आणि बीटरूट वाटा. गाजर, बीटरूटचा ज्युस त्वचेसाठी लाभदायक असतो. या रसामध्ये व्हिटॅमिन सी आणि झिंकचे प्रमाण भरपूर असते.
गाजर आणि बीटमुळे त्वचेचा रंग आणि पोत चांगला राहतो. चेहऱ्याची त्वचा मऊ आणि तजेलदार दिसू लागते. आता वाटलेले गाजर आणि बीट एका ग्लासमध्ये काढून घ्या. त्यामध्ये थोडेस पाणी ओता. सर्वात शेवटी त्यात डाळिंबाचा रस मिक्स करा. सर्व सामग्री पुन्हा एकदा मिक्स करून घ्या. गाजर, बीटरूट आणि डाळिंबचा हेल्दी ज्युस तयार झाला आहे. ज्युस तयार करण्यासाठी नेहमी ताज्या फळांचा वापर करावा, ही गोष्ट कायम लक्षात ठेवावी.कोणत्याही फळांचा ज्युस तयार केल्यानंतर त्याचे लगेचच सेवन करावे. अर्धा तास किंवा तासाभरानंतर फळांचा ज्युस पिणे टाळावे. असे केल्यास आरोग्यास अपाय होऊ शकतात. हे नुकसान टाळण्यासाठी फळांचा रस ताजा असतानाच पिणे योग्य ठरेल.
10 Comments