महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना व्हायरसमुळे लोकांच्या घराबाहेर पडण्यावर देखील बंधने आले आहेत. त्यासोबतच लॉकडाऊनमुळे यंदा अनेक सण लोकांना घरच्या घरीच साजरे करावे लागले. मे महिन्याची सुट्टीतही अनेकांना गावाला जाता आले नाही. अशा परिस्थितीत सर्व चाकरमानी निदान गणेशोत्सवासाठी जरी कोकणात जायला मिळेल याची वाट पाहत होते. मात्र रेल्वे बंद असल्यामुळे अनेकांना वाहनाने गावाला जावे लागत आहे. मात्र सर्वांनाच ते परवडण्यासारखे नसून ज्यांचे स्वत:चे वाहन नाही त्यांना गावी जाणे मुश्किल झाले होते. म्हणून विशेष रेल्वे गाड्या सुरु करावी अशी मागणी जोर धरू लागली होती.
अशा परिस्थितीत गणेशोत्सवानिमित्त कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सुरु करण्यास राज्य सरकारने शुक्रवारी परवानगी दिली आहे. दरवर्षी चाकरमानी गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी आतुरतेने वाट पाहात असतात. मात्र यंदा कोरोना व्हायरसमुळे हे चित्र बदलले होते. मात्र लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आता या चाकरमान्यांसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडजण्यात येणार आहेत. एसटी गाड्या सोडण्याचीही मंजुरी दिल्यानंतर आता विशेष रेल्वेही कोकणासाठी धावतील.
राज्य सरकारने मध्य रेल्वेला दिलेल्या पत्रात कोकणसाठी विशेष रेल्वेंचे नियोजन करण्यास सांगितले आहे. त्याचप्रमाणे मागणीनुसार गाड्या सोडतानाच कन्फर्म तिकीट आणि ई-पास असलेल्यांनाच यातून प्रवासाची मुभा देण्याच्या सूचना आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार रेल्वे प्रवासादरम्यान शारीरीक अंतर राखणे, सॅनिटाईज करणे बंधनकारक असणार आहे. यासंदर्भात मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आम्ही लवकरच माहिती देऊ, अशी माहिती लोकसत्ताशी बोलताना दिली.
17 Comments