महाराष्ट्र 14 न्यूज : धनतेरसच्या दुसर्या दिवशी छोटी दिवाळी साजरी केली जाते. त्याला ‘नरक चतुर्दशी’ असेही म्हणतात. या दिवशी अकाली मृत्यूचा धोका टाळण्यासाठी दिवा लावून यमराजाची पूजा केली जाते. हिंदू दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्यातील चतुर्दशी छोटी दिवाळी म्हणून साजरी केली जाते. यंदाच्या वर्षी सगळ्याच सणांवर मर्यादा आल्याने दिवाळीचे महत्त्व विशेष आहे. कोरोना महामारी संकटात दिवाळीच्या तेजोमय प्रकाशाने लोकांच्या चेहऱ्यावर आनंद फुलणार आहे दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी.
या दिवसाची महत्ता अशी आहे की याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. राक्षसाचा वध झाल्याने हा दिवस सण म्हणून साजरा केला जातो. या दिवशी अंगणात सूर्योदयापूर्वीच सडा रांगोळी करतात. पहाटे उठून शरीराला तेल लावतात, सुवासिक उटण्याने स्नान करतात. याला अभ्यंग स्नान असे ही म्हणतात.
नरक चतुर्दशीच्या दिवशी यमासाठी दीपदान करतात. गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करून घराच्या पुरुष मंडळींना स्नानाच्या वेळी औक्षण केले जाते. असे म्हणतात की, या दिवशी जो व्यक्ती अभ्यंग स्नान करत नाही त्याला नरकासम त्रास भोगावे लागतात. राक्षसी प्रवृतीचे प्रतिक म्हणून कारीट नावाच्या फळाला पायाने ठेचतात. ज्याप्रमाणे भगवंताने नरकासुराचा वध केला, त्याप्रमाणे आपणही आपल्यातल्या वाईट प्रवृत्तींना दूर करावे, अशी या मागची संकल्पना आहे.
यंदाचे शुभ मुहूर्त
चतुर्दशी तिथी 13 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजून 59 मिनिटांनी सुरू होईल आणि 14 नोव्हेंबर रोजी 2 वाजून 17 मिनिटांनी समाप्त होईल. 14 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 वाजून 23 मिनिट ते 6 वाजून 43 मिनिटांपर्यंत नरक चतुर्दशीची पूजा करण्याचा शुभ काळ आहे. या 1 तास 20 मिनिटात आपण नरक चतुर्दशीची पूजा करू शकता.
68 Comments