महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोनाच्या करीता पुढील वर्षी जुलैपर्यंत सरकार कोरोना लसीचे 40 ते 50 कोटी डोस मिळवणार आहे. या डोसचा तब्बल 25 कोटी लोकांवर वापर करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी रविवारी दिली. कोरोना लसीच्या उपलब्धतेबाबत त्यांनी चौथ्या ‘संडे संवाद’ कार्यक्रमात ही खूशखबर दिली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून लसीच्या सर्व बाबींचा उच्चस्तरीय समितीकडून आढावा घेतला जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना लस तयार झाल्यानंतर तिचे योग्य पद्धतीने, पारदर्शक वितरण करण्यासाठी सरकार दिवस-रात्र काम करीत आहे. देशातील प्रत्येक नागरिकांपर्यंत लस पोहोचवण्याला सरकारचे प्राधान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लस खरेदी करण्याचे काम केंद्र सरकार करेल, लसीच्या येणाऱ्या प्रत्येक साठ्यावर सरकार बारीक नियंत्रण ठेवले जाईल. लस प्राधान्याने कोरोनाग्रस्तांवर थेट उपचार करीत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाईल. सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांतील आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्याने ही लस दिली जाईल.
लस उपलब्ध झाल्यानंतर तिचे कुठे व कशा पद्धतीने वितरण करायचे, याचे सर्व नियोजन सरकारने करून ठेवले आहे. याच नियोजनानुसार लसीचे पारदर्शक आणि निष्पक्षपातीपणे वितरण केले जाईल. यात काळाबाजाराला कुठेही थारा दिला जाणार नाही, असेही आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले. येत्या काही महिन्यांत लसीच्या वितरणाचा आराखडा जाहीर केला जाईल, असे त्यांनी नमूद केले.
1 Comment