महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०२ सप्टेंबर) : शिक्षणाचे माहेरघर आणि देशातील अग्रगण्य शहर म्हणून ओळख असलेल्या पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावे 514 चौरस किलोमीटरचा भूभाग आहे. यामुळे पुणे शहराचा विकास करताना नियंत्रण राहत नाही हे वास्तव आहे. यावरच आज भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व कोथरूड आमदार चंद्रकांत पाटील यांनी बोट ठेवले. शहराचा वाढता विस्तार आणि लोकसंख्येचा विचार करता पुण्याचे विभाजन करून दोन महापालिकांची आवश्यकता आहे, अशी भूमिका राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी येथे मांडली.
ते पुण्यात एका कार्यक्रमात चंद्रकांत पाटील बोलत होते. गेल्या पाच वर्षात शहराच्या हद्दीत एकूण 34 गावांचा टप्याटप्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे शहराची भौगोलिक हद्दवाढ झाली असून पुणे देशातील सर्वाधिक मोठी महापालिका ठरली आहे. शहराचा वाढता विस्तार आणि वाढती लोकसंख्येमुळे पायाभूत सुविधा पुरविण्यावर महापालिकेला मर्यादा येत आहेत. या पार्श्वभूमीवर पाटील यांनी दोन महापालिकांची आवश्यकता अधोरेखीत केली.
दरम्यान, पुणे शहराचा विस्तार होत असल्याने महापालिका प्रशासनाला शहराचा गाडा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पूर्व भागाची एक महापालिका व पश्चिम भागाची दुसरी महापालिका करावी अशी मागणी गेल्या काही वर्षांपासून होत आहे. पण प्रत्यक्षात याबाबत कधीही निर्णय होऊ शकला नाही. राज्यात भाजपची सत्ता असल्याने व सत्ताधारी पक्षाचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यासाठी दोन महापालिका आवश्यक आहेत अशी भूमिका मांडल्याने आता तरी ही मागणी वास्तवात येणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.