महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२४जुलै) : यंदाच्या पावसाळ्यात राज्यात जवळपास 13 ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ग्रामीण भागात रडारयंत्रणा नसल्याने या पावसाचे मोजमाप करणे शक्य झाले नाही. परंतु, संबंधित परिसरातील पावसाचे (Rain) एकूण स्वरुप पाहता राज्यात 13 ठिकाणी ढगफुटी झाल्याचा दावा हवामान आयआयटीएमचे हवामानतज्ज्ञ डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
ताम्हिणी घाटात 468 मिमी पावसाची नोंद झाली. तर चिपळूण आणि महाबळेश्वरमध्ये अनुक्रमे 400 आणि 480 मिमी पावसाची नोंद झाली. एका तासात 100 मी.मी पाऊस झाला तर त्याला जागतिक हवामान संघटनेच्या मापकानुसार ढगफुटी घोषित करण्यात येते, असे डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड शहराची तहान भागवणाऱ्या पवना धरणक्षेत्राच्या परिसरातील पावसाचा जोर ओसरला आहे. पवना धरणातील पाणीसाठ्यात गेल्या 24 तासांत 4.99 टक्के तर गेल्या 72 तासांत 31.66 टक्के वाढ झाली. सध्या पवना धरणात 71.74 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. गेल्यावर्षी आजच्या तारखेला धरणात 34.96 टक्केच पाणीसाठा होता. गेल्या तीन दिवसात 579 मिमी पावसाची नोंद झाल्याने अशी सुखद परिस्थिती निर्माण झाली आहे.
2 Comments