महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ११ नोव्हेंबर २०२२ :- भारताचे पहिले केंद्रीय शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद हे थोर स्वातंत्र्यसैनिक, लेखक, कवी तसेच पत्रकार देखील होते, त्यांनी सामाजिक ऐक्यासाठी देशासाठी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण आहे असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने मौलाना अबुल कलाम आझाद यांची जयंती साजरी करण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ आणि उल्हास जगताप यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी अतिरिक्त आयुक्त वाघ बोलत होते.
या कार्यक्रमास जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते अझहर खान, निहाज देसाई, रुईनाज शेख,जाफर मुल्ला, फारूख इनामदार, मौलाना वकार रफीक कुरेशी, नाना शेख, खाजाभाई नदाफ, इमरान बिजापुरे, हाजी दस्तगीर मणियार, शहाबुद्दीन शेख, उपस्थित होते.
मौलाना अबुल कलाम आझाद यांनी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात भाग घेतला, अनेक वर्ष तुरुंगावासही भोगला. देशातील सामाजिक ऐक्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका घेऊन एकता जतन करण्यासाठी प्रयत्न केले, त्याचप्रमाणे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर ते देशाचे पहिले शिक्षणमंत्री झाले. शिक्षण मंत्री झाल्यानंतर त्यांनी शिक्षण क्षेत्रात आमुलाग्र बदल घडवून आणले असे सांगून मौलाना आझाद यांच्या कामगिरीबद्दल त्यांना भारत सरकारने भारतरत्न हा सर्वोच्च किताब बहाल केला आहे असेही अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ म्हणाले.