महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.२६ जून) : ग्रामीण भागातून मी आलो असल्याने गावात मराठा समाजाची सत्यस्थिती काय आहे, ती मला माहीत आहे. मराठा समाजात गरिबांची संख्या मोठी आहे. सर्व मराठा समाजाला नाही, मात्र गरीब मराठ्यांना आरक्षणाची नितांत गरज आहे. त्यामुळे सर्वप्रथम मराठा समाजाला आरक्षण देण्याची मी मागणी केली होती. मराठा समाजाला आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे.
महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाची बाजू नीट मांडली नाही. त्यामुळे मराठा समाजाला मिळालेले आरक्षण गेले. आरक्षणासाठीच्या लढ्यासाठी सर्व मराठा समाज एकत्र आला तर दलित समाजदेखील सर्व ताकदीने त्यांच्या पाठीशी उभा राहील, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले.
नवी मुंबईतील माथाडी भवन हॉल मध्ये राज्यव्यापी मराठा आरक्षण गोलमेज परिषदेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून रामदास आठवले बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार प्रसाद लाड, आमदार नरेंद्र पाटील, आमदार रमेश पाटील, सुरेश पाटील, रिपाइंचे जिल्हा अध्यक्ष आणि पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड, सिद्राम ओव्हाळ, यशपाल ओव्हाळ, सचिन कटारे आदी मान्यवर उपस्थित होते. या गोलमेज परिषदेस राज्यभरातील मराठा समाजाच्या 42 संघटना सहभागी झाल्या होत्या.
मराठा आरक्षणाचा प्रश्न मोदींसमोर मांडला
मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर नुकताच मांडला आहे. मराठा समाजाप्रमाणे देशभरातील मराठा, जाट, रेड्डी आदी क्षत्रिय समाजाला 12 टक्के आरक्षण दिले पाहिजे, या मागणीचा विचार करण्याची सूचना केली आहे. दलित अदिवासी ओबीसी कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी मराठा समाजातून होत आहे. त्यांच्या मागणीला दलित समाजाचा ही पाठिंबा आहे.
मराठा समाजात काही प्रमाणात श्रीमंत मराठा समाज असला तरी गरीब मराठा बहुसंख्य असून समाजाला आरक्षणाची गरज आहे. ओबीसींप्रमाणे ज्यांचे उत्पन्न 8 लाखांच्या आत आहे अशा मराठा समाजातील गरीब मराठ्यांना आरक्षण द्या. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी अण्णासाहेब पाटील यांनी सर्वप्रथम मोठे योगदान दिले आहे, त्यांची आठवण ठेवण्याचे आवाहन यावेळी रामदास आठवले यांनी केले.
37 Comments