महाराष्ट्र 14 न्यूज, दि. १८ जुलै २०२२ :- लिंकरोड पत्राशेड येथे पुनर्वसन प्रकल्प जेएनएनयुआरएम अंतर्गत केंद्र शासन राज्य शासन, महानगरपालिका व लाभार्थी झोपडीधारक यांच्या माध्यमातुन नागरिकांचे घराचे स्वप्न साकार होत असुन त्याचा उपयोग योग्य पद्धतीने करावा, असे आवाहन प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी केले.
प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृह , चिंचवड येथे लिंकरोड पत्राशेड येथील पुनर्वसन प्रकल्पातील ३ इमारती मधील एकुण ३३६ पैंकी २७३ लाभार्थ्यांना सदनिकांची संगणकीकृत सोडत प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांच्या हस्ते काढण्यात आली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे, कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी, प्रशासन अधिकारी श्रीकांत कोळप यांच्यासह झोपडपट्टी निर्मुलन व पुनर्वसन विभागाचे सर्व कर्मचारी व लाभार्थी उपस्थित होते.
आयुक्त पाटील म्हणाले, महानगरपालिकेने स्वछाग्रह अभियान सुरु केले आहे. या शहराला देशातील सर्वात स्वच्छ व सुंदर शहर बनविण्याची आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या परिसरात स्वच्छता ठेवणे आवश्यक आहे. लाभार्थ्यांनी मिळालेली सदनिका विक्री अथवा भाड्याने देवु नये, तसेच सदनिकाधारकांनी कचरा विलगीकरण करणे, कच-यापासून खत निर्मिती करणे, बंदी असलेल्या प्लास्टिकचा वापर टाळणे या बाबींकडेही लक्ष दिले पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना सहाय्यक आयुक्त सुषमा शिंदे यांनी लाभार्थ्यांना प्रकल्पाची माहिती दिली . विष्णु भाट यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर कार्यकारी अभियंता शिरीष पोरेड्डी यांनी उपस्थितांचे आभार मानले.