महाराष्ट्र 14 न्यूज : कोल्हापूर जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे . जिल्ह्यात तालुक्यांच्या पुढाकाराने कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कागल तालुक्यात रविवार पासून, तर गडहिंग्लज तालुक्यात आजपासून (7 सप्टेंबर) दहा दिवसांचा जनता कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. राधानगरी तालुक्याचा निर्णयही आज घेतला जाण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यातील जनता कर्फ्यू काळात अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना ओळखपत्र दाखवून कामावर जाता येणार आहे. जिल्ह्यात मोठ्या संख्येने कोरोना रुग्ण वाढू लागल्याने गाव आणि प्रभाग निहाय कुटुंबांचे आजपासून सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे.
कोरोना दक्षता समित्यांची ही पुनर्रचना होणार आहे. जिल्ह्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आरोग्य सर्वेक्षण प्रभावीपणे राबविण्याचा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यंत्रणांना दिल्या आहेत. जिल्ह्यात काल (6 सप्टेंबर) दिवसभरात 27 कोरोना बळी तर नव्या 520 रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बळींचा आकडा 875 वर पोहोचला आहे. कोरोना कहर थांबवण्यासाठी तातडीने उपाययोजनांची गरज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात 1 ते 6 सप्टेंबर दरम्यान 3 सप्टेंबर वगळता रोज 20 च्यावर कोरोना बळी होत आहेत. 3 सप्टेंबरला 19 कोरोना बळी झाले आहेत.
दरम्यान, कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयातील कनिष्ठ निवासी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 11 सप्टेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सहा महिन्यांच्या काळात सुविधा आणि सुट्टी मिळाली नसल्याचा आरोप अधिकाऱ्यांनी केला आहे. कोरोना काळात संपाच्या इशाऱ्याने आरोग्य व्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. या रुग्णालयात 70 निवासी वैद्यकीय अधिकारी आहेत. यापैकी 25 जणांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.
13 Comments