महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.३१मे) : सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण करणाऱया मान्सूनच्या आगमनावरून हवामानाचा अंदाज सांगणाऱया स्कायमेट आणि भारतीय हवामान खात्यामध्ये चांगलीच जुंपली आहे. स्कायमेट म्हणतेय मान्सून केरळमध्ये दाखल झाला आहे तर भारतीय हवामान खाते म्हणतेय की, मान्सूनसाठी 3 जूनपर्यंत थांबावे लागेल. हवामान खात्याने 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होईल असा अंदाज याआधी केला होता, मात्र आता दोन्ही संस्था अंदाज अपना अपना सांगत आहेत. स्कायमेटने देशात मान्सून 30 मे रोजीपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज व्यक्त केला होता.
त्यानुसार सर्वसामान्य गतीने मान्सून केरळकडे सरकत आहे. अंदमान-निकोबार द्वीपसमूहामध्ये 21 मे रोजी दाखल झाल्यानंतर उत्तर-पश्चिम दिशेने मान्सून पुढे सरकत आहे. मान्सून 24 मे रोजी श्रीलंकेत दाखल झाला असून पुढील तीन दिवसांत तो श्रीलंकेच्या उत्तरेकडे पोहचणार होता. 27 मे रोजी मान्सून मालदीवमध्ये दाखल झाला होता त्यावेळी मान्सून केरळपासून 200 किलोमीटर दूर होता. ‘तौकते’ आणि ‘यास’ चक्रीवादळानंतर देशाच्या पश्चिम आणि पूर्व किनारपट्टीवर मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर 30 मेपर्यंत केरळमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला होता.
हवामान खात्याने 27 मे रोजी 31 मेपर्यंत केरळमध्ये दाखल होईल, असे म्हटले होते, मात्र सर्वसामान्यपणे देशात 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होतो. मात्र नंतर मान्सून 3 जूनपर्यंत देशात दाखल होईल, असे हवामान खात्याने म्हटले आहे. दरवर्षीप्रमाणे सामान्य मान्सून राहील असे सांगत जून ते सप्टेंबरमध्ये घेण्यात येणाऱया तांदूळ, मका तसेच इतर पिके नेहमीप्रमाणे घेऊ शकता, असे हवामान खात्याने म्हटले आहे.
130 Comments