महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३ऑगस्ट) : कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरू लागल्यानंतर राज्य सरकारने सोमवारी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील एकूण 1१ जिल्हे वगळता इतर जिल्ह्यांतील निर्बंधांत शिथिलता आणण्याचा निर्णय जारी केला. त्यामुळे निर्बंध शिथिल झालेल्या जिल्ह्यात शॉपिंग मॉलसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत खुली राहतील. तर मुंबई आणि ठाण्याच्या संदर्भात स्थानिक आपत्ती व्यवस्थापनाकडून निर्बंध शिथिलीकरणाचा निर्णय घेण्यात येणार आहे. मुंबई लोकलबाबत अजून कोणताही निर्णय झालेला नाही.
राज्य सरकारच्यावतीने मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सोमवारी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत निर्बंध शिथिल करण्याबाबतची नवी नियमावली जाहीर करण्यात केली.
त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, सोलापूर तर कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील अहमदनग तर मराठवाड्यातील बीड अशा ११ जिल्ह्यांत निर्बंध कायम राहणार आहेत.
नव्या नियमावलीनुसार वरील जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त अन्य जिल्ह्यांमध्ये निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार आता या जिल्ह्यांत शॉपिंग मॉल्ससह सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत उघडी ठेवता येणार आहेत. शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ती उघडी ठेवता येतील. रविवारी मात्र फक्त अत्यावश्यक सेवांची दुकानेच उघडी ठेवता येणार आहेत. रात्री ९ ते पहाटे ५ वाजेपर्यंत नेहमीचेच निर्बंध कायम राहणार आहेत.
सार्वजनिक उद्याने ही व्यायाम, चालणे, सायकल चालविणे आदीसाठी खुली ठेवता येतील. सर्व प्रकारची सरकारी तसेच खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. शेतीविषयक कामे, उद्योग, मालवाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू ठेवता येणार आहेत. जिम, योगा सेंटर्स, केशकर्तनालय, स्पा ही एसी शिवाय ५० टक्के क्षमतेने सोमवार ते शुक्रवार संध्याकाळी ८ वाजेपर्यंत तर शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत खुली राहतील तर रविवारी मात्र ती बंद ठेवावी लागतील.
कोणत्याही प्रकारचे सिनेमागृह किंवा नाट्यगृह मात्र बंदच ठेवावे लागणार आहे. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे देखील बंदच राहणार आहेत. शाळा आणि महाविद्यालयाबाबत शिक्षण विभागाचे निर्णय कायम राहतील.
हॉटेल, रेस्टॉरंट ४ वाजेपर्यंत खुली राहणार
सर्व हॉटेल, रेस्टॉरंट त्यांच्या ५० टक्के क्षमतेने दुपारी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. त्यानंतर मात्र सध्या सुरू असलेली पार्सल सेवा सुरू ठेवता येईल. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक, राजकीय, सामाजिक रॅली वा एकत्र येण्यास सध्याचे निर्बंध कायम असणार आहेत
5 Comments