महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यात कोरोनाचा कहर सुरूच आहे. दिवसेंदिवस राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच आहे. सरकारी रुग्णालयात खाटा शिल्लक नस्ल्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना खासगी रुग्णालयाचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, खासगी रुग्णालये कोरोनाच्या उपचारांसाठी अव्वाच्या सव्वा दर आकारात आहेत. कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी खासगी रुग्णालये आणि रुग्णवाहिकांनी अवाजवी शुल्क आकारणी करू नये, असे निर्देश राज्य शासनाने वेळोवेळी दिले आहेत. या निर्देशांची अंमलबजावणी योग्यप्रकारे होत आहे की नाही याच्या तपासणीसाठी राज्यात भरारी पथके नेमण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मुंबईत दिली.
यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांना पत्र पाठविले असून तपासणी अहवाल तीन दिवसात शासनाला सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. कोरोनाबाधित रुग्णांना वाजवी दरात उपचार मिळावेत यासाठी राज्य शासनाने २१ मे २०२० ला काढलेल्या अधिसूचनेद्वारे खासगी रुग्णालयांना कमाल दर मर्यादा निश्चित करून दिली आहे. त्याचबरोबर राज्यातील सर्व नागरिकांना महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली असून खासगी वाहने आणि रुग्णवाहिका अधिग्रहीत करून त्यांचे कमाल दरही निश्चित करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे खासगी रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून देण्याबाबतच्या अधिसूचनेच्या प्रभावी अमंलबजावणीचेही निर्देश देण्यात आले असताना अद्यापही खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांकडून जास्तीचे शुल्क आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याची दखल घेऊन राज्यातील जनतेच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची प्रभावी आणि काटोकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी तसेच विभागीय आयुक्तांनी देखील त्यांच्या स्तरावर भरारी पथक नेमण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत.
166 Comments