Google Ad
Editor Choice Health & Fitness

माझं आरोग्य : माझं आरोग्य माझ्या हाती … सुदृढ आयुष्य कसं जगायचं!

महाराष्ट्र 14 न्यूज : ( माझं आरोग्य ) माझं आरोग्य, माझ्या हाती … सुदृढ आयुष्य कसं जगायचं!

दिवसभरातला थोडा वेळ आपल्या स्वतः साठी, काढायचा आहे. आपलं शरीर सुदृढ करायचं आहे. रोज आपला सकस आहार आणि नियमित व्यायाम करायचा आहे. कोणत्याही आजाराचा बळी होऊन ह्या सुंदर आयुष्याला वेळे आधीच संपवायचं नाही. आपल्या बरोबर असलेल्या आपल्या परिवाराला, मित्रांना आनंद द्यायचा आहे, दुःख नाही. सुदृढ आयुष्य जगायचं आहे.

Google Ad

ऐकून आश्चर्य वाटावं असंच आहे, आपण आपला दिवस उजाडला की काय काय करतो हे आठवून बघितलं तर आपल्या दिनचर्येत ठरलेल्याच गोष्टी रोज रोज करतो आहोत, का रोज काही बदल करतो आहोत हे लक्षात येईल.

कोणी पहाटे ४/५ वाजता उठून आपल्या दिनाचर्येला सुरुवात करतात. कोणी मेडिटेशन करतात, तर कोणी पहाटेच फिरायला जातात, तर कोणी जिम मध्ये जाऊन व्यायामाला सुरुवात करतात.

कोणी सुर्योदयापर्यंत अंथरूणाताच ढाराढुर घोरत असतात. पुढारी, मंत्री, उद्योगपती, पिक्चरचे ऍक्टर रात्री उशिरा झोपतात आणि सूर्य डोक्यावर आला की डोळे उघडून दिनाचर्येला सुरुवात करतात. ( यात सर्वजण नाही. ) तर काहीजण काळजीपूर्वक लवकर उठतात.

हे सगळं ज्याच्या त्याच्या व्यवसाय, नोकरी, किंवा विद्यार्थी असल्यास त्याच्या वेळापत्रका प्रमाणे ठरते. आता हे ठरवतं कोण हो? आपले आपणच ठरवतो की…

पण ते कळत नाही त्या वेळेस, कारण प्रत्येक माणूस लहानपणी त्याला घरातून लागलेल्या सवयी मोठा झाल्यावर, म्हणजे जबाबदार किंवा कर्ता झाल्यावर विसरून जातो?

कारण लहानपणी सकाळची शाळा असते म्हणून लवकर झोपून सकाळी लवकर उठून, आवरून शाळेत जायची सवय असते, तीच सवय कर्ता झाल्यावर रहात नाही.

कर्ता झाल्यावर रात्री उशिरा झोपणे, त्यामुळे उशिराच उठणे, ही सवय बहुतेक लोकांना लागते. कारण नोकरी किंवा व्यवसाय ह्यातून जसा वेळ मिळेल तसे सवयीमध्ये बदल होत जातात.

कामाचा ताण सुद्धा काहींना असतो. काही लोक उशिरा झोपून उशिरा उठणारे असतात. त्यांना त्यांच्या-त्यांच्या सवयी प्रमाणे शारीरिक त्रास भोगायला लागतात, काही लोक ऍसिडिटी ने बेजार असतात, तर काही रक्तदाब, तर काही हृदय रोग, तर काही मधुमेही होतात.

कोणी अति गोड खाणारे असतात, तर कोणी अति तिखट, कोणी चमचमीत खाणारे तर कोणी मिळेल ते खाऊन पोटाची मोट करणारे असतात. त्यांच्या-त्यांच्या आहारा प्रमाणे त्यांना काही त्रास पण होतात. काही लोक खूप कष्ट करतात, तर काही नुसते एका ठिकाणी बसून काहीच कष्ट न करता काम करतात.

तर काही लोक मात्र पचेल एवढंच खातात, रोज नियमित व्यायाम करतात, आणि आपली नोकरी किंवा व्यवसाय अगदी उत्तम करतात. ते आपलं आरोग्य सुद्धा सांभाळून असतात.

पण नुसतं एकाच जागेवर बसून काम करणारे सुद्धा खूप लोक आहेत. त्यांची नोकरी किंवा व्यवसाय हा बसून काम करायचा असतो. मग त्यांना कोणत्या त्रासाला सामोरं जावं लागतं????

अप्लाईड फिजिओलॉजी जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून निघालेले निष्कर्ष चिंताजनक असल्याचं आढळून आलंय.

काही लोकांना नोकरी किंवा व्यवसाय करताना दिवसभर बसून काम करायला लागते. आय. टी. च्या क्षेत्रातल्या लोकांना अशी बसून कामं करावी लागतात.

व्यापारी लोकांना सुद्धा काही वेळा बसून काम करावे लागते. पण हळू हळू ही बसण्याची सवय लागून जाते. अशा लोकांना, चालणे, किंवा उभे राहणे अवघड होत जाते. त्यांना सतत बसण्याची इच्छा होते, जास्त वेळ उभं राहणं त्यांना जमत नाही. ह्या मागची कारणं काय असू शकतील?

सतत बसून राहिल्याने अशा लोकांचा पोटाचा आकार वाढायला लागतो. कारण कामाला सुरुवात केली की बसायला लागते. नाष्टा केला की परत बसायचं, दुपारी जेवण केलं की पुन्हा बसायचं आणि काम करायचं. पोटाचा घेर वाढण्याचं हे मुख्य कारण असते. कॉम्प्युटर वर काम करताना फक्त डोळे आणि हाताची बोटं ह्यांनाच काम असतं, पोट कसं वाढत गेलं हे त्यांना कळत नाही.

पोट वाढत गेलं की आपोआप शरीराच्या हालचाली कमी होत जातात, शरीरातला चपळ पणा कमी होत जातो. शरीरात मेद वाढायला लागतो. नुसता पोटाचाच नाही तर एकूण शरीराचाच घेर वाढत जातो. आणि अशा वजनदार लोकांना सतत बसण्याची सवय लागते. एखादी वस्तू हवी असली तर स्वतः न उठता इतर लोकांना कामाला लावून हे लोक एका जागी बसून राहतात.

ह्या सतत बसून राहण्याचा परिणाम काय होऊ शकतो हे सहज लक्षात येत नाही. शरीर स्थूल होते, शरीरात मेद वाढल्यामुळे शरीर जड होते, आणि शरीराची चयापचय क्रिया हळू हळू मंद व्हायला लागते. कारण शरीराची हालचाल होत नाही.

स्नायूंना काही ताणच दिला जात नाही. ते शिथिल व्हायला लागतात. त्यामुळे शरीरातल्या रक्त वाहिन्या दाब पडल्यामुळे रक्ताभिसरण जसे व्हायला पाहिजे तसे होत नाही, आणि हृदयावर ताण पडायला लागतो. मग रक्तदाब, हृदय विकार अशा समस्या सुरू होऊ शकतात.

टेक्सास युनिव्हर्सिटीतल्या काही संशोधकांनी दिवसभरात १३ तास बसून असणाऱ्या लोकांच्या शरीरावर कोणते कोणते परिणाम होतात हे प्रत्यक्ष काही तरुणांवर प्रयोग करून सिद्ध केलं आहे.

एक तरुणांचा गट तयार करून त्यांना दिवसातले १३ तास फक्त बसायला सांगितलं. त्यांच्यावर लक्ष ठेऊन त्यांच्या पायांच्या हालचाली दिवसभरात कमीत कमी होतील एवढी खबरदारी घेतली.

१३ तास बसायला लावल्या मुळे त्या मुलांचे शरीराचे स्नायू शिथिल झालेले जाणवले. त्यांना कमी कॅलरीज असलेला नाश्ता दिला गेला, त्या नंतर त्यांच्या शारीरिक तपासणीत त्यांच्या रक्तातली साखर वाढल्याचे आढळून आलं, आणि ट्राय ग्लिसराईड्स चं प्रमाण सुद्धा वाढलं.

नंतर त्यांना ट्रेडमिल वर एक तास व्यायाम करायला सांगितलं गेलं, आणि पुन्हा तपासणी केली तर रक्तातली साखर आणि ट्राय ग्लिसराईड्स चं प्रमाण वाढलेलं तसंच होतं, कमी झालं नाही. त्यांना थकवा आला होता, शरीर सुस्त झालं होतं. त्यांचे स्नायू शिथिल झाले होते.

म्हणजे फक्त दिवसभरात १३ तास जर आपण बसून राहिलो तर एवढा मोठा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो. पण आपण रोजच्या कामाच्या धबडग्यात ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो. आणि कमी वयातच मोठ्या आजारांचे बळी पडतो. मुख्य परिणाम म्हणजे आपलं शरीर निष्क्रिय होत जाते. आणि सगळ्यात मोठा परिणाम आपल्या चयापचय क्रियेवर होतो.

आपल्या शरीराची पचन संस्था नीट कार्य करत नसेल तर मधुमेह ह्या दुर्धर आजाराकडे आपण वाटचाल करतो आहोत हे आपण जाणून घेतलं पाहिजे. जास्त काळ श्रम न करता बसून राहिलो तर मोठ्या आजारांना आपण आमंत्रण देतो.

ह्या संशोधकांनी आपल्याला हे सगळं शोधून, सिद्ध करून दिलं आहे, आपल्याला ते फक्त आपल्या रोजच्या जीवनात आणून आपलंच स्वास्थ्य ठीक करायचं आहे. शरीर ठणठणीत ठेवायचं आहे. आपली नोकरी, किंवा व्यवसाय बसून काम करायचा असला तरी सुद्धा आपल्याला ह्या नको असलेल्या भयानक आजारांपासून दूर राहायचं आहे.

दिवसभरातला थोडा वेळ आपल्या स्वतः साठी, काढायचा आहे. आपलं शरीर सुदृढ करायचं आहे. रोज आपला सकस आहार आणि नियमित व्यायाम करायचा आहे. कोणत्याही आजाराचा बळी होऊन ह्या सुंदर आयुष्याला वेळे आधीच संपवायचं नाही. आपल्या बरोबर असलेल्या आपल्या परिवाराला आनंद द्यायचा आहे, दुःख नाही. सुदृढ आयुष्य जगायचं आहे.

आपल्या आरोग्यासाठी या छोट्या छोट्या गोष्टी करणं आपल्याच हातात आहे.
आपल्याला सुदृढ राहायचे तर असते पण त्या दृष्टीने करायच्या प्रयत्नात आपण कमी पडतोय हे नक्की. प्रयत्न अतिकष्टाचेच असतील असे अजिबात नाहीये. थोडा व्यायाम आपण रोज वाढवला तरी तो फायद्याच्याच आहे.

जसे ऑफिस मध्ये २ तास काम झाले की जरा खुर्चीतल्या खुर्चीत बसून पायाचे व्यायाम आपण करू शकतो. हात, खांदे फिरवून ते मोकळे करू शकतो.

स्वतःचा चहा – कॉफी हेल्पर ला आणायला न सांगता आपण स्वतःच उठून आणलेली केव्हाही चांगलीच आणि हो त्या चहा कॉफी आणि त्याच्या सोबत येणाऱ्या स्नॅक्स वर सुद्धा जरा कंट्रोल केला तर उत्तम.

रात्री खूप वेळ मोबाईल-टीव्ही वर घालवण्यापेक्षा जरा शतपाऊली केली किंवा चौकापर्यंत एखादी रपेट मारली तर तेवढ्याच कॅलरी बर्न व्हायला हातभार..

जिम, सायकल, सकाळचे जॉगिंग असा ऍक्टिव्ह व्यायाम करता आला तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. व्यायामाला चांगल्या आहाराची जोड मिळाली की बसून बसून वाढणाऱ्या वजनाला चाप लागेलच..

हेल्दी डायट साठी ‘मनाचेtalks’ च्या जुन्या आणि भविष्यात येणाऱ्या पोस्ट कडे लक्ष ठेवा आणि तसे डायट शक्य तितके करण्याचा प्रयत्न करा, सोबत भरपूर पाणी प्या..

हे सगळे छोटे छोटे उपाय आपण करू शकलो तरी आपल्याला उत्साह वाटेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो जरासे स्वतःला पुश करा आणि सुखकर जीवन जगा मग १३ तास बसून काम करायचे असले तरी बेहत्तर..!!

Google Ad

About the author

Maharashtra14 News

8 Comments

Click here to post a comment

Featured

Advertisement 1

Advertisement 2

Advertisement 3

Advertisement

error: Content is protected !!