महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०३जून) : अखेर बारावीची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा अधिकृतपणे रद्द झाल्या आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच बारावी परीक्षा रद्द करण्याचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला पाठवल्याचं सांगितलं होतं. शिवाय कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत परीक्षा रद्द करण्याच्या अनुषंगाने चर्चा झाली होती.
याबाबत माहिती देताना काल वर्षा गायकवाड म्हणाल्या होत्या, “बारावीच्या परीक्षांसदर्भातील परिस्थिती आम्ही मंत्रिमंडळासमोर मांडली आहे. आमचा प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवला आहे. आपत्ती व्यवस्थापन विभागाची बैठक दोन दिवसांमध्ये होईल. त्यानंतर त्यांची परवानगी आली की आम्ही परीक्षेबाबत निर्णय जाहीर करू”
बारावीची परीक्षा 23 एप्रिलला होणार होती. नंतर आपण ती पुढे ढकलली. केंद्राने दोन दिवसापूर्वी सीबीएससीच्या परीक्षा रद्द केल्या. राज्य सरकारनेही याबाबत विचारणा केली होती. आम्ही मंत्रीमंडळाला इतर राज्यांची माहिती दिली. त्यानुसार आम्ही बारावी परीक्षा निर्णयाची फाईल आपत्ती विभागाला सोपवत आहोत. ही एक असाधारण परिस्थिती असल्याने आपत्ती विभाग निर्णय घेईल लवकरच त्यांची बैठक होईल आणि ते निर्णय़ घेतील.
त्यानंतर आम्ही बारावी परीक्षा निर्णयाबाबत कळवू. मुलांचं आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. केंद्र सरकारसोबत झालेल्या बैठकीत आम्ही जी भूमिका मांडली होती. ती भूमिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवली आहे. मुंबई हायकोर्टात सरकार बाजू मांडेल. सरकार उद्या होणाऱ्या सुनावणीत बाजू मांडेल, असंही वर्षा गायकवाड यांनी काल सांगितले होतं.
महाराष्ट्र सरकारने अखेर बारावीच्या परीक्षा रद्द केल्या आहेत. या निर्णयाचा 14 लाख विद्यार्थ्यांना फायदा होईल. महाराष्ट्र सरकारनं बारावीच्या परीक्षासंदर्भात केंद्राकडे विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा मुद्दा मांडला होता. त्यावर विचार करुन केंद्रानं सीबीएसईच्या परीक्षा रद्द केल्या.
1 Comment