महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यभरात आजपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्याचबरोबर कोरोना संकटामुळे यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
“सण आणि उत्सवांची बदलेली रुपं आपण पाहिली आहेत. यातील काळानुरुप बदल आपण स्वीकारले आहेत. सामाजिक जागृतीसाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात झाली. कोरोनामुळे जिथं संपूर्ण जग हादरुन गेलं आहे तिथं याविरुद्ध एक मोठा लढा लढण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. यातून एक नवे समाज प्रबोधन आपण करु आणि सामाजिक भान ठेवून शांततेत यंदाचा गणेशोत्सव साजरा करु”, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
गणरायाची प्रतिष्ठापना आपण दरवर्षीप्रमाणे यंदाही करत आहोत. मात्र यावेळेस आपल्यासमोर कोरोनाचे विघ्न आहे. या विघ्नातून लवकर मुक्ती मिळावी, तसेच या साथीचा मुकाबला करण्यासाठी कोव्हिड योद्ध्यांना आणि आपल्या सर्वांना शक्ती मिळो, अशी प्रार्थना बाप्पाकडे केली आहे”, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
“संपूर्ण उत्सव काळात गर्दी होणार नाही, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी. गाफील न राहाता आतापर्यंत आपण जी काळजी घेतो आहोत तीच पुढेही घ्यावी”, असं आवाहनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.
3 Comments