महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना महामारीने देशभरातील सर्वच उद्योगक्षेत्रांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून वाहतूक व्यवसाय क्षेत्राला सुद्धा मोठा फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या वाहतूक क्षेत्रास काही प्रमाणात दिलासा मिळावा याकरीता केंद्र सरकारने कर्ज परतफेडीसाठी अतिरिक्त 4 महिन्यांची (डिसेंबर 2020 पर्यंत) विनाव्याज मुदतवाढ द्यावी अशी मागणी वाहतूकदारांच्या वतीने शिव वाहतूक सेना, मुंबई बस मालक संघटनासह इतर वाहतूक संघटनांनी केली आहे. ही मागणी मान्य न केल्यास बँकेत आम्ही आमचे वाहने जमा करणार असल्याचे वाहतूकदारांनी सांगितलं आहे.
याबाबत शिव वाहतूक सेनेने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन आणि तशी शिफारस करण्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेकडे निवेदन सादर केले होते. यापूर्वी केंद्र सरकारने मार्च ते ऑगस्ट अशी 6 महिन्यांसाठीची कर्जफेड मुदतवाढ जाहीर केली होती. मात्र, अद्याप कोरोनावरील खात्रीशीर लस बाजारात उपलब्ध झाली नसल्याने तसेच परिस्थिती पूर्णत: नियंत्रणात नसल्याने बहुतांश उद्योगधंदे अजूनही ठप्पच आहेत. शिवाय केंद्र सरकारने मार्च 2020 पासून लागू केलेली टाळेबंदी अद्याप पूर्णपणे उठवलेली नाही.
मात्र, बँकाकडून कर्जवसुलीसाठी रोज तगादा सुरुच असून कर्जहफ्ते भरण्यासाठी वारंवार दबाव आणला जात असल्याची तक्रार वाहतूकदारांनी केली आहे. टाळेबंदीमुळे गेले 6 महिने व्यवसायच नसल्याने घर चालवायचं कसं? असा प्रश्न असताना कर्जाचे हप्ते भरायचे तरी कुठून अशी चिंताजनक व्यथा वाहतूक व्यावसायिक मांडत आहेत.
21 Comments