महाराष्ट्र 14 न्यूज, दि. ११नोव्हेंबर) : महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त एक आढावा बैठक आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेत सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे झाली. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर, खा. राहुल शेवाळे उपस्थित होते.
राज्याचे मुख्य सचिव, पोलिस आयुक्त, मुंबई महापालिका आयुक्त, राज्य सरकार, मुंबई महापालिका आणि पोलिस प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, भिक्खू संघ आणि समन्वय समितीचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
सुरक्षेची व्यवस्था, चैत्यभूमी तसेच मुंबईत लाखोंच्या संख्येने येणाऱ्या अनुयायांची व्यवस्था, आरोग्य शिबीर, पुष्पवृष्टी इत्यादींचा आढावा घेण्यात आला.
शासकीय मानवंदनेची प्रथा सुरू केल्याबद्दल समिती सदस्यांनी देवेंद्र फडणवीस यांचे यावेळी आभार मानले.
4 डिसेंबर हा रविवार असल्याने आणि मुंबईतील भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता लक्षात घेता या दिवशी मेगाब्लॉक करण्यात येणार नाही, असा निर्णय रेल्वेने जाहीर केला.
सर्व व्यवस्था अतिशय चोख असावी आणि कोणतीही कमतरता राहू नये, असे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिले.
बैठकीत आलेल्या सर्व विधायक सूचनांवर अंमल केला जाईल. साहित्य मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून अनुयायांना विचारांचा शिधा उपलब्ध करून द्यावा. शासन व्यवस्था करीत असली तरी हा संपूर्ण समाजाचा कार्यक्रम आहे. त्यामुळे प्रत्येक सूचना स्वीकारल्या जातील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी आश्वस्त केले.