महाराष्ट्र 14 न्यूज,(दि.३ मे २०२२) : थोर समाजसुधारक महात्मा बसवेश्वर यांचा विज्ञानाधारीत मानवतावादी दृष्टीकोन सर्वाना एकसंध ठेवण्यासाठी आजही दिशादर्शक ठरत आहे,त्यांच्या विचारांचा वारसा भावी पिढीने जोपासावा असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी केले.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा बसवेश्वर यांचे जयंती निमित्त मुख्य प्रशासकीय इमारतीमधील त्यांच्या प्रतिमेस अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, यावेळी महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त सर्वांना शुभेच्छा देताना ते बोलत होते .
या कार्यक्रमास सहाय्यक आयुक्त वामन नेमाणे, जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक, सामाजिक कार्यकर्ते उमाकांत शेटे, संजय गायके, डॉ.कवठेकर, सोमनाथ धोंडे, सुरेखा वाळके, बाळासाहेब शेटे, सुरेश रिषम, बसवराज पाटील, आर.एस. देशिंगे, ढवळे सर, बसवराज धुमनसुटे, सुरेश वाळके, बिराजदार विजय, अशोक नगरकर, हनुमंत गुल्याड, चंद्रशेखर हुनशाळ, अमरमाना आदी उपस्थित होते.
अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप म्हणाले महात्मा बसवेश्वर यांनी समाजातील अनिष्ठ रूढी, परंपरेविरुध्द लढा दिला. विषमतावादी समाजरचनेला विरोध करून सर्वाना समान न्याय व वागणूक देण्यासाठी तसेच स्त्रियांना सन्मानाची वागणूक देण्यासाठी ते सतत आग्रही असायचे. महात्मा बसवेश्वर हे त्यांच्या नम्र स्वभाव, प्रसन्न चेहरा, मधुर वाणी आणि प्रचंड बुद्धिमत्ता यामुळे सदैव स्मरणात राहतील असेही जगताप म्हणाले.
महात्मा बसवेश्वर यांची जयंती महाराष्ट्रात सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यात येते. आजच्या कार्यक्रमात अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी रमझान ईद व अक्षय तृतीय या सणानिमित्त शहरवासियांना शुभेच्छा दिल्या.