महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. ३१मे) : मराठा आरक्षणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मी कोणासोबतही चर्चा करण्यासाठी तयार आहे. पण समोरच्यांनी राजकारण करु नये, असे वक्तव्य विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले. संभाजीराजे छत्रपती सध्या आरक्षणासाठी राज्यभरातील नेत्यांच्या भेटी घेत आहेत. त्यामध्ये काहीही गैर नाही. ते मलादेखील भेटले होते. त्यावेळी मी संभाजीराजेंना इतकंच सांगितलं की, आम्ही मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी कोणासोबतही चर्चेला बसायला तयार आहोत. केवळ समोरच्यांनी राजकारण करु नये, एवढीच आमची अपेक्षा असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संभाजीराजेंच्या भूमिकेचे स्वागत केले. संभाजीराजे मराठा आरक्षणासाठी राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणायचा प्रयत्न करत आहेत. त्यासाठी भाजपचा पाठिंबाच आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
ठाकरे सरकार सत्तेत आले तेव्हाच सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी समाजाच्या अतिरिक्त आरक्षणासंदर्भात काही आदेश दिले होते. त्यावेळी न्यायालयाने राज्य मागासवर्ग आयोग तयार करण्यात आदेश दिले होते. मात्र, 15 महिन्यांच्या काळात ठाकरे सरकारने काहीच हालचाली केल्या नाहीत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाला मुदतवाढ देण्यास नकार दिला, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ते सोमवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
ठाकरे सरकारच न्यायालयात ओबीसी आरक्षण 50 टक्क्यांपेक्षा अधिक असल्याची कबुली देऊन बसले. तसेच त्यांनी घटनापीठाने दिलेल्या आदेशाच्यादृष्टीनेही कोणतीही कार्यवाही केली नाही. परिणामी आमच्या काळात अध्यादेश काढून मिळवलेले ओबीसी आरक्षण न्यायालयाने रद्द केले. आता राज्य सरकारने तातडीने हालचाली केल्या तर किमान 50 टक्क्यांच्या आतमधील आरक्षण तरी वाचवता येईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
52 Comments