महाराष्ट्र 14 न्यूज : प्रजासत्ताक दिन हा दिवस 26 जानेवारी 1950 या महत्वपूर्ण दिवसाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ज्यादिवशी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्ट 1935 मागे टाकून भारताचे संविधान देशाने स्वीकारले होते. भारताने ब्रिटिश राजवटीपासून स्वातंत्र्य हे 1947 सालीच इंडियन इंडिपेंडेन्स अॅक्ट 1947नुसार मिळवले, मात्र 1950 सालापर्यंत भारत हा एक सार्वभौम राष्ट्र बनलेला नव्हता. याचसाठी प्रजासत्ताक दिन हा भारतीय संविधान लागू झाल्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो.
🇮🇳 काय आहे प्रजासत्ताक दिनाचे महत्व?
भारतीय संविधानाचा मसूदा हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली तयार केला गेला ज्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जाते. प्रजासत्ताक दिन म्हणून 26 जानेवारी या दिवसाची निवड केली गेली कारण 1930 साली याच वर्षी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने इंग्रजांचा प्रस्ताव फेटाळून लावत पूर्ण स्वराजची घोषणा केली होती.
🇮🇳 26 जानेवारी रोजी स्वीकारली गेली होती भारताची घटना
गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अॅक्टनुसार भारतीय कायदे हे ब्रिटिश सत्तेच्या कायद्यांचेच सुधारित रूप होते. भारताची स्वतंत्र घटना तयार करण्यासाठी डॉ. बी. आर. आंबेडकरांच्या अध्यक्षतेखाली एक मसुदा समिती स्थापन केली गेली. हा मसुदा 4 नोव्हेंबर 1947 रोजी घटनासमितीला सादर केला गेला होता आणि 26 नोव्हेंबर रोजी त्याला मंजुरी देण्यात आली. मात्र 26 जानेवारी 1950 या दिवसापासून घटना लागू करण्यात आली.
🇮🇳 कसा साजरा केला जातो प्रजासत्ताक दिन?
प्रजासत्ताक दिन हा भारताच्या संविधानाचे महत्व अधोरेखित करतो. त्यामुळे हा दिवस संपूर्ण देशात उत्साहाने साजरा केला जातो. या दिवसाचे सर्व मुख्य कार्यक्रम हे देशाची राजधानी दिल्लीत राष्ट्रपतींच्या उपस्थितीत साजरे केले जातात. राजपथावर भारताचा आणि त्याच्या विविधतेच्या गौरवार्थ एका भव्य पथसंचलनाचे आयोजन केले जाते. याशिवाय प्रत्येक राज्यातही प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. पुरस्कार वितरण हाही या कार्यक्रमाचा महत्वाचा भाग असतो. भारताचे राष्ट्रपती यादिवशी पद्म पुरस्कारांचे वितरण करतात. यात पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश असतो.
14 Comments