महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने कोरोना संकटाच्या काळात सर्व जनतेला वाऱ्यावर सोडले आहे . जनतेला राज्य सरकारने काहीच मदत केली नाही . राज्यातील दुध उत्पादक शेतकरीही अडचणीत आहे . देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दुधाला सरसकट प्रती लिटर ५ रुपये अनुदान व दुध भुकटी निर्यातीस अनुदान दिले गेले, आता तर दुधाचे दर त्यावेळेपेक्षाही खालावले आहेत, मात्र राज्यातील नाकर्त्या सरकारने दुध उत्पादक शेतकऱ्यांनाही वाऱ्यावर सोडून दिले आहे, असे म्हणत या मागण्या मान्य करण्याकरिता भाजपा महायुतीच्यावतीने १ ऑगस्टला राज्यभरआंदोलनाचा इशारा दिला आहे.
देवेंद्रजी फडणवीस , चंद्रकांतदादा पाटील, महादेवराव जानकर, सदाभाऊ खोत, अविनाशजी महातेकर, विनायकराव मेटे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. १ ऑगस्ट रोजी अन्यायाविरूद्ध एल्गार करणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी असून याच दिवशी दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर अहिंसक पद्धतीने ‘ महाएल्गार आंदोलन भाजपच्या वतीने करण्यात येणार असल्याचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी कळवले आहे.
गायीच्या दुधाला सरसकट प्रती लिटर १० रुपये अनुदान द्या , दुध भुकटी निर्यातीला प्रती किलो ५० रुपये अनुदान द्या , दुध खरेदीचा दर प्रती लिटर ३० रुपये करा , या मागण्यांचे व राज्य सरकारच्या धिक्काराचे फलक घेऊन राज्यभर सकाळी दुध संकलन केंद्रावर आंदोलन आणि नंतर जिल्हा , तालुका व ठिकठिकाणी रास्ता रोको आंदोलन असे कार्यक्रमाचे स्वरूप असल्याचे समजते.
4 Comments