महाराष्ट्र 14 न्यूज : राज्यातील करोना रुग्ण वाढीची वेगवेगळी कारणं सांगितली जात असली तरी आता या करोना वाढीचं खापर फेरीवाल्यांवर फोडलं जात आहे. नालासोपाऱ्याच्या तुळींज पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकाने पालिका आयुक्तांना पत्र लिहून बेकायदेशीर फेरीवाल्यांमुळेच करोनाचा संसर्ग वाढल्याचा दावा केला आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
तुळींज पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डीएस पाटील यांनी पालिका आयुक्त गंगाधरन डी यांना पत्र लिहून हा दावा केला आहे. तुळींज पोलीस ठाण्याचा परिसर हा गर्दीचा परिसर आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर फेरीवाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस ठाण्याच्या चारही बाजूला या अनिधिकृत फेरीवाल्यांनी बस्तान बसवले आहे. फेरीवाल्यांच्या बजबजपुरीमुळे या परिसरातून गाडीच काय पायी चालणंही मुश्किल होऊन गेलेलं आहे. या फेरीवाल्यांबद्दल स्थानिकांनी अनेकदा तक्रारी केल्या. पालिकेनेही अनेकदा कारवाई केली. पण फेरीवाले पुन्हा आहे त्याच जागी येऊन बसत असल्याने पालिकेचीही डोकेदुखी वाढली आहे. राज्यात करोनाचं संकट असतानाही अनेक बेकायदेशीर फेरीवाले नालासोपार परिसरात बेकायदेशीर सामानांची विक्री करत आहेत.
संध्याकाळी या परिसरात फेरीवाल्यांची मोठी गर्दी होत असून नागरिकही खरेदीसाठी बाहेर पडत आहे. त्यामुळे या फेरीवाल्यांमुळे करोनाचा संसर्ग वाढला असून अजूनही संसर्ग वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या फेरीवाल्यांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि सदर परिसर फेरीवाला मुक्त करावा, अशी मागणी पाटील यांनी या पत्रातून केल्याचं सूत्रांनी सांगितलं.
17 Comments