महाराष्ट्र 14 न्यूज : महाराष्ट्रातील अत्यंत चुरशीची झालेल्या विधान परिषद निवडणुकीत भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यांमध्ये जोरदार धक्का देत महाविकास आघाडीने विजयश्री खेचून आणला आहे. निवडणुकीत तीन पक्ष एकत्रित आल्याने महाविकास आघाडीला फायदा झाला. पुणे आणि नागपूर हे भाजपचे बालेकिल्ले आहेत. पण महाविकास आघाडीने भाजपचे चक्रव्ह्यूव भेदत हे दोन्ही किल्ले काबीज केले.
सत्तांतर झाल्यानंतरच्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्रित लढवलेलीही ही पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्व महाराष्ट्रातील जनतेचे लक्ष लागलं होतं. भाजपची निवडणूक जिंकण्यासाठीची रणनीती यशस्वी होणार की दोन वेगळ्या विचारधारेच्या आघाडीला मतदार स्वीकारतील याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडी विरुद्ध भाजप या नव्या समीकरणावर पहिल्यांदाच मतदान झालं आणि त्यात महाविकास आघाडीला लोकांनी स्वीकारल्याचं दिसून आलं आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी एकमेकांकडे मतं ट्रान्सफर करून एकी दाखवल्याचे दिसून आले.
विजयाबद्दल पिंपरी चिंचवड शहरातील जुनी सांगवी परिसरातील अहिल्याबाई होळकर पुतळा चौकात महाविकास आघाडीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना व घटकपक्षांच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येवून फटाके वाजवून व लाडू वाटप करत कार्यकर्त्यांनी अहिल्याबाई होळकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करत ढोल ताशांच्या गजरात जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे, सुनील ढोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे ब्लॉक अध्यक्ष शिवाजी पाडुळे, पंकज कांबळे, उज्ज्वला ढोरे, दीपक ढोरे, रोहित शेळके, चेतन शिंदे, सुदामराव ढोरे, कुंदन कसबे, सिकंदर पोंगडे, विजय साने, स्वरूपा खापेकर, ऋतुजा बिराजदार, गौरव चौधरी, वीरेंद्र गायकवाड, बाबा खराडे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
6 Comments