महाराष्ट्र 14 न्यूज : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. महाविद्यालयातील युवा वर्ग हा रक्तदानासाठी महत्वाचा स्त्रोत आहे. मात्र, कोविड-19 च्या प्रादुर्भावामुळे महाविद्यालये बंद आहेत. तसेच रक्तदानात अग्रेसर असणाऱ्या बऱ्याच मोठ्या कंपन्या, कॉर्पोरेट हाऊस यांच्याकडून वर्क फ्रॉम होम सुरु असल्यामुळे रक्त संकलनामध्ये अडचणी येत आहेत.
कोरोना काळात राज्यात रक्ताची टंचाई भासत असून रुग्णालयांमध्ये केवळ ५ ते ७ दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा शिल्लक आहे. त्यामुळे ह्या प्रश्नावर तोडगा म्हणून राज्यातील लोकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. सध्या राज्यात उपलब्ध असलेला रक्तसाठा आणि प्लेटलेट्स साठा लवकरात लवकर संपण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळात रक्तसाठ्यासाठी एरवी ज्या प्रमाणात रक्तदान शिबिरे घेतली जातात तेवढी आता घेण शक्य नाही. तसेच महाविद्यालयीन तरुण हेसुद्धा रक्तदान करणारे असले तरी सध्या महाविद्यालये बंद असल्यामुळे रक्तदान कमी प्रमाणात होत आहे.
परंतु तरीही जे इच्छुक असतील त्या नागरिकांनी कोरोनाबाबत सगळी काळजी घेत रक्तदान आणि प्लेटलेट्सदान करावे असे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. सध्या मुंबईतील ५८ रक्तपेढ्यांमध्ये ३,२३९ युनीट रक्त आणि ६४१ युनीट प्लेटलेट युनीट उपलब्ध आहेत. आणि हा साठा आपल्याला केवळ ५ ते ७ दिवसच पुरू शकतो. त्यामुळे भविष्यात आपत्कालीन परिस्थितीत जर रुग्णाला आवश्यकता भासली तर अशावेळी मात्र रक्तसाठा करणाऱ्या संस्थांना जागरूक राहणे फार आवश्यक असेल.
11 Comments