महाराष्ट्र 14 न्यूज, (दि.०१ जून) : भुलभुलैया २ या हिंदी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन याने नुकतीच एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या रहाटणी येथील इंटरनॅशनल स्कूलला भेट दिली. यावेळी संस्था तसेच विद्यार्थ्यांनी आर्यनचे मोठ्या उत्साहात स्वागत केले. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या आगमनाने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी अभिनेता आर्यनसोबत गप्पा मारल्या , तसेच त्याच्या वाटचालीशी निगडीत कांही प्रश्नही विचारले.
त्याचबरोबर आर्यनने विद्यार्थ्यांसोबत नृत्याविष्कार सादर केला. त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या संचालिका अँड. ऋतुजा भोसले यांनी अभिनेता आर्यनचे पुष्पगुच्छ देऊन संस्थेच्या वतीने स्वागत केले.
यावेळी एसएनबीपी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे चेअरमन डॉ. डी. के. भोसले यांच्यासह विविध शाखांमधून आलेले प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. एसएनबीपी संस्थेद्वारे करण्यात आलेला पाहुणचार, झालेले अनोखे स्वागत याबद्दल आर्यनने आभार व्यक्त केले.
अभिनेते कार्तिक आर्यन म्हणाले की मला अशा तरुण विद्यार्थ्यांमध्ये दर वर्षी यायला आवडेल व अशा प्रकारचा अभिनय मी कायम करत राहीन .
या संधीबद्दल त्यांनी संस्थेचे आभार मानले .
संस्थापक डॉ. डी के भोसले यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेतला. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्याच्या आगमनामुळे मुलांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे . आपल्या आवडत्या अभिनेत्याच्या भेटीमुळे विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
संस्थेच्या संचालिका अँड ऋतुजा भोसले यांनी आपल्या मनोगतात संस्थेच्या यशस्वी वाटचालीचा उल्लेख केला.
अँड ऋतुजा भोसले म्हणाल्या की, संस्थेचे हे अमृतमहोत्सवी वर्षे असून चांगल्या दर्जाच्या शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल यादृष्टीने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहेत. तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या अभिनेता कार्तिक आर्यन यांना शाळेत आमंत्रित करण्यात आले. या नवोदित अभिनेत्यास भेटण्याची व त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी आम्ही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी आम्ही विविध कलाकारांना , नामवंत खेळाडूंना आमंत्रित करत असतो.आपापल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना भेटल्यामुळे विद्यार्थ्यांना देखील त्यांच्यापासून प्रेरणा मिळावी ,यशाचे शिखर गाठण्यासाठी प्रोत्साहन मिळावे हा या मागचा हेतू असतो.