महाराष्ट्र 14 न्यूज, (दि. १९ एप्रिल) : वाढते काेराेना संक्रमण राेखण्यासाठी राज्य शासनाने रात्रीला संचार तर दिवसा जमावबंदी लागू केली. मात्र, पिंपरी चिंचवड शहरातील नवी सांगवीतील भाजीबाजारात सोमवारी (दि. १९ ) ग्राहकांची खरेदीकरिता मोठया प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. नवी सांगवीतील मुख्य मार्गावर पाेलिसांचा चाेख बंदाेबस्त असताना या भाजीमंडईत नागरिक काेराेना प्रतिबंधात्मक उपाययाेजनांचा फज्जा उडवित मुक्तसंचार करीत हाेते.
विशेष म्हणजे, अलीकडच्या काळात पिंपरी चिंचवड शहर काेराेना संक्रमणामध्ये आघाडीवर आहे. काहींनी सर्व नियम धाब्यावर ठेवून शहरात मुक्तसंचार करायला सुरुवात केली आहे. त्यात काही काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांचा समावेशही असू शकतो, हे कोण, कोणाला सांगणार ?
नवी सांगवीतील साई चौकात मंदिरा समोरील भाजीबाजारात अनेक ग्राहकांनी भाजी खरेदी करण्यासाठी गर्दी केली हाेती. या बाजारात फिजिकल डिस्टन्सिंग न पाळणे, मास्कचा वापर नाकाखाली असे चित्र दिसत होते. त्यामुळे नागरिकांचा हा बेजबाबदारपणा काेराेना संक्रमणास अधिक कारणीभूत ठरणार हे मात्र नक्की!
राज्यात आधी लागू केलेले कडक निर्बंध आणि त्यानंतर लागू केलेली संचारबंदी याचा रुग्णवाढ रोखण्यात फायदा होत नसल्याचं चित्र पिंपरी चिंचवड शहरात समोर आलंय. शहरात कडक निर्बंध लागू केल्यापासून आतापर्यंत रुग्ण संख्येत घट झाल्याचे अजूनतरी दिसत नाही, त्याला हीच करणे जबाबदार आहेत, असे या गर्दीवरून दिसून येते. यामुळे रुग्णवाढीचा ताण शहरातील आरोग्य यंत्रणेवर येताना दिसतोय.
राज्यात अनेक ठिकाणी बेडस् उपलब्ध नाहीत. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतो आहे. रेमडेसीवर इजेक्शन मिळत नाही अशा तक्रारी वाढू लागल्या आहेत. दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने राज्यात ही स्थिती निर्माण झालीय. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठी राज्य सरकारने 5 एप्रिल पासून राज्यात कडक निर्बंध आणि विक एण्ड लॉकडाऊन लागू केला. पण जनतेला त्याच काही घेणं देणं दिसत नाही, हे मात्र नक्की !
मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये संपूर्ण राज्यभर रस्त्यावर शुकशुकाट असायचा. मात्र आता तसं चित्र नाही. त्यामुळेच कोरोनाची साखळी तोडायची असेल, रुग्णवाढ रोखायची असेल तर राज्य सरकारला संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याशिवाय पर्याय नाही.
61 Comments